कर्ज काढून किती शेतकरी बँकेत ‘एफडी’ करतात?; महसूलमंत्र्यांचा संतापजनक सवाल

0

जळगाव: जिल्ह्यात असे किती शेतकरी आहेत जे कर्ज घेऊन दुसर्‍या बँकेत फिक्स डिपॉझिट (एफडी) करतात, असा संतापजनक सवाल करत महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल शनिवारी १८ रोजी शेतकर्‍यांची थट्टा केली आहे. संपुर्ण जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असतांना ना. चंद्रकांत पाटील यांनी 1501 गावांपैकी अवघ्या नऊ गावांचा धावता दौरा करून दुष्काळाचा आढावा घेतला. पालकमंत्र्यांच्या या धावत्या दौर्‍यामुळे शेतकर्‍यांसह जिल्हावासियांमध्ये तीव्र नाराजीचा सुर उमटत आहे.

जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता अधिकच तीव्र झाली आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथून ऑडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हानिहाय दुष्काळाचा आढावा घेतला होता. त्यानंतर पालकसचिवांसह पालकमंत्र्यांना दुष्काळी दौरा करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.

जिल्ह्यात 1501 गावे हि दुष्काळाच्या छायेत आहे. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जनावरांना चारा देखिल उपलब्ध होत नसल्याने पशुपालक पशुधन विकण्याच्या मनस्थितीत आले आहे. अशा परीस्थीतीत शासनाकडून दिलासा मिळण्याऐवजी त्यांची चेष्टा केली जात आहे. पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी गिरणा पट्ट्यातील नऊ गावांना भेटी देऊन त्याठिकाणी शेतकर्‍यांशी संवाद साधला. या दौर्‍यात शेतकर्‍यांना पालकमंत्र्यांकडे पीककर्ज, शेतीचे पाणी, जनावरांसाठी चारा छावण्या यासारख्या समस्या मांडल्या. यातील बहुतांश समस्यांवर पालकमंत्र्यांनी आश्वासन देऊन वेळ मारून नेली.

शेतकर्‍यांची थट्टा केल्याने संताप
खरीप आढावा बैठकीत पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना झालेल्या कर्जवाटपाचा आढावा घेतला. कर्जवाटपाची माहिती देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक राठोड यांनी चक्क दांडीच मारली. त्यामुळे अचुक माहिती पालकमंत्र्यांना मिळाली नाही. दरम्यान पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी असे किती शेतकरी आहेत जे कर्ज घेऊन दुसर्‍या बँकेत एफडी करतात? असा सवाल करताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पालकमंत्र्यांनी शेतकर्‍यांप्रती केलेला हा सवाल म्हणजे त्यांची थट्टाच असल्याचे बोलले जात आहे.