बंगळूर: कर्नाटकमधील राजकीय नात्याला दररोज नवनवीन वळण लागत आहे. काल विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला, मात्र त्यावर मतदान घेण्यात आले नाही. दरम्यान आज दुपारी १.३० वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी कर्नाटक सरकारला दिले आहे. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. विश्वासदर्शक ठरावाशिवायच विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. ज्याविरोधात भाजपा आमदारांनी ठिय्या आंदोलन करत रात्र विधानसभेतच घालवली.
आरोप प्रत्यारोपांच्या या सगळ्या फैरीनंतर विश्वासदर्शक ठरावासाठी १८ जुलै ही तारीख ठरली खरी मात्र त्यादिवशी विश्वासदर्शक ठराव सादर झालाच नाही. ज्यामुळे भाजपा खासदारांनी कर्नाटक विधानसभेतच ठिय्या मांडला. भाजपचे खासदार एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी संपूर्ण रात्र विधानभवनात घालविली.
कर्नाटकमधल्या ११ आमदारांनी राजीनामा दिल्यापासून कर्नाटकात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. ज्यादिवशी काँग्रेसच्या ८ आणि जेडीएसच्या ३ आमदारांनी राजीनामा दिला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री कुमारस्वामी हे तडकाफडकी अमेरिकेहून कर्नाटकात परतले होते. तेव्हापासूनच सत्तासंघर्ष चांगलाच रंगतो आहे. लोकसभेतच्या कर्नाटकी नाटकाचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. कर्नाटकमध्ये भाजपा पैशांच्या जोरावर सरकार अस्थिर करत आहे असा आरोप राहुल गांधी यांनीही केला होता. तसेच कर्नाटकमध्ये आमदारांना फोडण्यामागे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा हात असल्याचेही काँग्रेसने म्हटले होते. तर आमचा काँग्रेसच्या आणि जेडीएसच्या वादाशी काहीही संबंध नाही त्यांना घरातले भांडण सोडवता येत नाही आणि ते आमच्यावर खापर फोडत आहेत असे प्रत्युत्तर राजनाथ सिंह यांनी दिले होते.