नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा आणि अधिकार बहाल करणारे कलम 370 रद्द करण्यात आले आहे. परंतु त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
अॅड. एम. एल. शर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी कलम 370 रद्द करणे हा चुकीचा निर्णय असल्याचे म्हटले आहे. तसेच विधानसभेतील प्रस्तावाशिवाय जम्मू-काश्मीर राज्याचे दोन भाग करणे अवैध असल्याचे याचिकेत म्हटले आहे.सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे.दि.6 ऑगस्ट रोजी जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेले कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक विधेयक राज्यसभेनंतर आज लोकसभेतही मंजूर झाले. विधेयकाच्या मंजुरीसाठी लोकसभेत सर्व खासदारांनी मतदान केले होते. 351 विरुद्ध 72 मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आले. तसेच यावेळी जम्मू काश्मीर राज्याचे दोन भाग करण्याचे विधेयक मांडण्यात आले. त्यानुसार जम्मू काश्मीर आणि लडाख अशी दोन राज्य बनवण्यात आली आहेत. दोन्ही राज्य केंद्रशासित घोषित करण्यात आली आहेत.