कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेची तारीख जाहीर

0

जळगाव:  कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या / अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग विषयांसह प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने केले जाणार असून अपवादात्मक परिस्थितीतच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देता येईल. दि. 15 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील व 1 ऑक्टोबर पासून लेखी परीक्षा होऊन 31 ऑक्टोबर पर्यंत निकाल जाहीर केले जातील. विशेष म्हणजे या लेखी परीक्षा वस्तूनिष्ठ स्वरूपात बहूपर्यायी असणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी या परीक्षांच्या स्वरूपाविषयी माहिती दिली.

प्रात्यक्षिक परीक्षा 15 सप्टेंबर पासून सुरु
सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या / अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिले होते. राज्यशासनाने या परीक्षांचे स्वरूप ठरविण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार कार्यवाही करण्यासाठी विद्यापीठाने स्थानिक पातळीवर परीक्षा आयोजन व वेळापत्रक निश्चित करण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. त्या समितीने दिलेल्या शिफारशींचा अहवाल दि. 5 सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या विद्यापरिषद, परीक्षा व मूल्यमापन मंडळ आणि व्यवस्थापन परिषद या प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यामध्ये या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने व वस्तूनिष्ठ स्वरूपात बहूपर्यायी घेण्याचा निर्णय झाला. पदवी परीक्षांसाठी 60 गुणांची परीक्षा राहणार असून परीक्षेचा कालावधी 90 मिनिटांची असेल. तर पदव्युत्तर परीक्षेसाठी 60 गुणांची परीक्षा व 120 मिनिटांचा कालावधी असेल. प्रत्येक प्रश्नाला एक गुण राहील. प्रात्यक्षिक परीक्षा 15 सप्टेंबर पासून सुरु होतील. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.