बंगळुरू : खासगी कंपनींमधील वाढत्या ऑटोमेशनमुळे कामाचा वेग वाढला असला तरीही काम करणार्या हातांची संख्या मात्र दिवसेंदिवस घटत चालली आहे. माणसाने यंत्राचा शोध लावला. पण आता तेच यंत्र माणसाच्या रोजगारावर उठले आहे, अशी काहीशी परिस्थिती सध्या सर्वत्र निर्माण होत आहे. जे काम पूर्वी आठ कामगार करत होते, तेच काम आता एक मशीन करत आहे. इतक्या मोठ्या तफावतीचा कामगारांच्या संख्येवर थेट परिणाम होत आहे. बंगळुरू हे आयटी क्षेत्रातील हब मानले जाते. देश-विदेशातून लोक या ठिकाणी नोकरीसाठी येत असतात. इथल्या आयटी कंपन्यांमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात नोकर्याही उपलब्ध होत असतात. मात्र, आता या क्षेत्रातील कामगारांसाठी एक वाईट बातमी आली आहे.
बंगळुरूमधील काँग्निजंट या आयटी कंपनीने अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळे काही कर्मचार्यांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये किमान 6,000 आयटी तज्ज्ञांना आपली नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून आयटी क्षेत्राची स्थिती नाजूक झाली असल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. नव्या डिजिटल सर्व्हिसेसमुळे अनेक नोकर्या जाऊ शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.
कर्मचार्यांच्या पगारीतील तफावत हेदेखील या मागचे एक कारण आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही कर्मचार्यांचा पगार हा 20,000 ते 30,000 दरम्यान असतो तर व्यवस्थापकांचा वार्षिक पगार हा कोट्यवधी असतो. त्यांच्या पगारात असणार्या तफावतीमुळे हा तणाव निर्माण होत असल्याचेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच मार्चच्या शेवटी वार्षिक मूल्यांकनावेळी कामगिरी व्यवस्थितरीत्या पार न पाडणार्या 1 टक्के कर्मचार्यांना कंपनी नोकरीवरून काढून टाकले जाते. ही प्रक्रिया दरवर्षी होते. मात्र, यावेळी नेहमीपेक्षा अधिक लोकांना कामावरून काढून टाकण्यात येईल. त्याचबरोबर ऑटोमेशनमुळे कनिष्ठ स्तरावरील कामे करण्यासाठी व्यक्तीची आवश्यकता कमी झाली आहे. त्याचाही परिणाम या क्षेत्रावर झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी कंपनीने 1 ते 2 टक्के कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले होते. मागच्या वर्षी 1 टक्के कर्मचार्यांना काढून टाकण्यात आले होते. या कंपनीतील एकूण कर्मचार्यांची संख्या 2,60,000 इतकी आहे. त्यापैकी 1,88,000 कर्मचारी भारतामध्ये आहेत.
या संपूर्ण वृत्ताबाबत प्रतिक्रिया देताना, कंपनीच्या एका अधिकार्याने सांगितले की, आमची उद्दिष्टे गाठण्यासाठी आम्ही दरवर्षी ही प्रक्रिया राबवतो. त्यामुळे आवश्यक ती कौशल्ये असणारी व्यक्तिच कंपनीमध्ये राहते. अन्य कंपन्यांमध्ये जर त्यांना नोकरीची संधी उपलब्ध असेल तर त्यांना जाऊ दिले जाते. मागील वर्ष कंपनीसाठी आव्हानात्मक होते. नेहमी 2 अंकी विकासदर गाठणार्या काँग्निजंट या कंपनीचा विकासदर 2016 मध्ये 8.6 टक्के होता. यामुळेही हा कठोर निर्णय घेण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.