भुसावळ- भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दीपनगरातील लेवा समाजातील गुणवंतांच्या गौरव सोहळ्यात केलेल्या एका वक्तव्यामुळे ते भाजपा सोडून काँग्रेस किंवा अन्य दुसर्या पक्षात जाणार का? या विषयी आता जोरदार चर्चा जळगाव जिल्ह्यात रंगली आहे. दीपनगर केंद्रातील सकल लेवा पाटीदार समितीतर्फे स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा नुकताच झाला. या कार्यक्रमात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी काँग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हासराव पाटील यांनी माजी मंत्री खडसे यांच्यावर अन्याय होत असल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये यावे, असे जाहीर आवाहन केले होते मात्र माजी मंत्री खडसे यांनी आपल्या भाषणात डॉ.पाटील यांच्या आवाहनास नकार दिला मात्र अन्याय झाला तर योग्यवेळी, योग्य ठिकाणी त्याचा प्रतिकार केला पाहिजे, आपण संख्येने कमी नाही, असे सूचक वक्तव्य केले. त्यांचे हे विधान समाजबांधवांना उद्देशून असलेतरी तरी त्याकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जावू लागले आहे. यामुळे खडसे भाजपा पक्ष सोडणार का? अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.