मुंबई: देशात सध्या कांद्याच्या भाव गगनाला भिडले आहे. कांद्याच्या प्रश्नावरून संसदेसह देशभरात गदारोळ सुरू आहे. या मुद्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच भाष्य केलं आहे. कांद्याच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार आहे. त्याचबरोबर दर नियंत्रणात आणण्यासाठी तुर्कीतून कांद्याची आयात करण्यात आली आहे. केंद्र सरकारला या विषयी तीन महिन्याअगोदर इशारा दिला होता असे राष्ट्रवादी पक्ष प्रमुख शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
या मुलाखतीत शरद पवार यांनी राज्यातील सत्तांतर, महाविकास आघाडीच्या स्थापनेसह कांद्याची दरवाढ याविषयी संवाद साधला. देशातील कांद्याच्या दरवाढीचा मुद्दा सध्या देशभरात चर्चेत आहेत. संसदेमध्येही या मुद्यावर बराच गोंधळ झाला. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी भाववाढीच्या कारणाचा खुलासा केला. शरद पवार म्हणाले, “तीन ते चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला. पण, केंद्र सरकारने त्यावेळी चांगला भाव कांद्याला दिला नाही. यामुळे पुढच्या हंगामात कांदा उत्पादक शेतकरी दुसऱ्या पिकांकडे वळला. असल्याचे सांगितले.
महाविकास आघाडीत सहभागी होताना धर्मनिरपेक्षतेविषयी शिवसेनेला तडजोड करावी लागली का? या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, ज्यावेळी एकत्र येऊन काम करण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. त्यावेळी तडजोड करावीच लागते. इथे फक्त शिवसेनेलाच तडजोड करावी लागलेली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही तडजोडी स्वीकारल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.