मुंबई- कांदा निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रोत्साहन योजनेला ३० जून २०१७ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. याबाबत कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) निर्मला सितारामन यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
सध्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांत मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने या योजनेस मुदतवाढ दिल्याने राज्यातील कांदा उत्पादक व निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला बाजारपेठ मिळविणे व इतर देशांशी स्पर्धा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कांदा निर्यातीत वाढ होऊन आगामी काळात कांदा बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यरता आहे, असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी गुरूवारी व्यक्त केला.
सध्या बाजारात उन्हाळ कांद्याच्या आवकेत वाढ होत असून हा कांदा टिकाऊ व निर्यातक्षम असल्याने येथील निर्यातदारांना कांदा निर्यातीस वाव आहे. अशा परीस्थितीत केंद्र शासनाने सदर योजनेस ३० जून २०१७ पर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळेल, असेही ते म्हणाले.