कारची ओरिजिनल चाबी हरविल्यास विमा विसरा !

0

नवी दिल्ली-कारच्या ओरिजिनल चाबी हरवणे कदाचित चांगलेच महागात पडू शकते. त्यामुळे एखाद्यावेळी कार चोरीला गेली तर कदाचित विमा कंपनीनुकसान भरपाई नाकारू शकते. दिल्लीमध्ये काही कारमालकांना असा अनुभव आला आहे. गाडी चोरीला गेल्यावर जेव्हा त्यांनी विमा एजंटला फोन केला तेव्हा त्यांना सांगण्यात आले की तुम्हाला दोन्ही ओरिजिनल चाव्या द्याव्या लागतील. जर एखादी चावी जरी हरवली असेल तरी तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो असेही सांगण्यात आले.

काही कारमालक कार चोरीला गेलेली नसताना कार चोरीला गेल्याचा दावा करत नुकसानभरपाई मागतात, त्यामुळे अशी जोखीम कमी करण्यासाठी विमा कंपन्या असे करत असल्याचे सांगण्यात येत आहे. विमा नियंत्रक प्राधिकरण किंवा इरडाच्या नियमांमध्ये अशी काही तरतूद नसून त्यांनी ही बाब त्या त्या विमा कंपनीवर सोडलेली आहे. याचा फायदा घेत काही विमा कंपन्यांनी कार चोरीला गेली असल्यास क्लेम मिळवण्यासाठी दोन्ही ओरिजिनल किल्ल्या सादर करणे आवश्यक असल्याचा नियम सांगितला आहे. जर एखाद्या व्यक्तिची खरोखरच एखादी किल्ली हरवली असेल आणि त्याची गाडी चोरीला गेली तर त्यानं काय करायचं असा प्रश्न या निमित्तानं विचारला आहे.