पुणे/मुंबई : बहुचर्चित मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी भायखळा कारागृहाच्या सहा पोलिस अधिकार्यांना वाचविण्यासाठी केलेल्या व्हॉटसअॅप मॅसेजमुळे आता नवीनच वाद उफळून आला असून, पोलिस खात्यातील शीतयुद्धही चव्हाट्यावर आले आहे. या वादग्रस्त पोस्टमध्ये साठे यांनी आपण सगळे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या भगिनींना भक्कम आधार देऊ, असे नमूद करत प्रसारमाध्यमांमुळेच सहा पोलिस अधिकार्यांना अटक झाली, आता तरी मीडियाचा आत्मा शांत झाला असेल, अशा आशयाची वादग्रस्त पोस्ट टाकली होती. ही पोस्ट एका इंग्रजी दैनिकाने चव्हाट्यावर आणल्यानंतर साठे यांनी या प्रकरणाच्या चौकशीतून अंग काढून घेतले आहे. साठे यांनी वरिष्ठांना पत्र लिहून शेट्ये हत्याकांडाच्या चौकशीतून मोकळे करावे, अशी विनंती केली आहे. 23 जूनरोजी मंजुळा शेट्ये हिची कारागृहात निर्घृण हत्या झाली होती. त्या प्रकरणाचा तपास सरकारने साठे यांच्याकडे दिला होता. परंतु, त्या आरोपींना वाचवित असल्याची बाब मीडियाने चव्हाट्यावर आणल्यानंतर सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे.
पोलिसांतील शीतयुद्ध चव्हाट्यावर?
मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणामुळे पोलिस खात्यातले शीतयुद्धही उघडकीस आले आहे. ठाणे कारागृहाचे निलंबित तुरंगाधिकारी हिरालाल जाधव यांनीही याप्रकरणी स्वाती साठेंविरोधात तक्रार दाखल करून, त्या आरोपींच्या सुटकेसाठी पैसे गोळा करत असल्याचा आरोप केला, इतकेच नाही तर आपण सगळे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या भगिनींना भक्कम आधार देऊ असे त्यांनी लिहिल्याचा आरोपही जाधव यांनी केला आहे. साठे यांच्या व्हायरल पोस्टमुळे याप्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणाचे खापर साठे यांनी थेट मीडियावरच फोडले आहे. गत आठवड्यात मुंबई गुन्हे शाखेने शेट्ये हिच्या हत्येप्रकरणी तुरुंगाधिकारी मनिषा पोखरकर, सुरक्षारक्षक बिंदू नाईकोडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुडवे आणि आरती शिंगणे यांना अटक केली होती. सरकारने त्यांना निलंबितही केले आहे. या कर्मचार्यांना भगिनी संबोधून स्वाती साठे यांनी त्यांना वाचविण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती व्हॉटसअॅप ग्रूपवर केली होती.
हिरामण जाधव यांचे नेमके आरोप काय?
ठाणे कारागृहाचे निलंबित अधिकारी हिरामण जाधव यांनी याप्रकरणी आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. स्वाती साठे या बेकादेशीररित्या आरोपींना वाचविण्यासाठी पैसे मागत असल्याचे असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले. अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून 500 आणि 1 हजार रूपये मागितले जात आहेत, हे कोणत्या कायद्यात बसते असाही प्रश्न त्यांनी विचारला. तुरूंगात जेवणाची कमतरता असल्यामुळे आणि तिथल्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे 23 जूनचा प्रकार घडला असल्याचेही जाधव यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी आता स्वाती साठे यांच्या अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या भायखळा कारागृहात 23 जूनरोजी मंजुळा शेट्येला जबरदस्त मारहाण झाली होती, त्यानंतर 24 जूनला तिचा मृत्यू झाला होता. शीना बोरा हत्याकांडात मुख्य आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने या प्रकरणी मंजुळावर सगळ्या महिला कैद्यांच्या समोर लैंगिक अत्याचार झाले असल्याची कबुली दिली होती, ज्यामुळे खळबळ माजली होती.