गिरीश बापट यांची जिल्हा प्रशासनासोबत बैठक
बाधितांना खास बाब म्हणून मदत देण्यासाठी 3 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे
पुणे : खडकवासल्याचा मुठा उजवा कालवा फुटून नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाले असून दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या नागरिकांना खास बाब म्हणून मदत देण्याबाबतचा 3 कोटींचा प्रस्ताव तात्काळ पाठवावा, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिल्या. तसेच प्रस्तावामध्ये कालवा फुटण्याची दुर्घटना ही नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरण्याबाबत विनंती करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मुठा कालवा दुर्घटनेसंदर्भात आयोजित बैठकीत बापट बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसिलदार गीता दळवी, हेमंत निकम उपस्थित होते.
मदतीची विनंती करणारा प्रस्ताव तात्काळ पाठवावा
बापट म्हणाले, प्रस्तावामध्ये कालवा फुटण्याची दुर्घटना ही नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरण्याबाबत विनंती करण्यात यावी. शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्णयानुसार कालवा-बाधितांना नुकसान भरपाई मिळेलच, पण हानीची तीव्रता पाहता खास बाब म्हणून 3 कोटी रुपयांच्या मदतीची विनंती करणारा प्रस्ताव तात्काळ पाठवावा. या प्रस्तावास मंजुरी मिळावी यासाठी पाठपुरावा केला जाईल. कालवा-बाधित भागातील घरांचे पंचनामे पूर्ण झालेल्या संपूर्ण कुटुंबाची यादी त्या भागातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे देऊन संबंधित कुटुंबांना धान्य वाटप करण्यात यावे, यावेळी नियंत्रण व देखभालीसाठी जिल्हा प्रशासनाचा प्रतिनिधी असावा,असे स्पष्ट करून बापट म्हणाले, मुठा उजवा कालवा फुटून या भागातील घरांमध्ये पाणी जाऊन त्यांच्या घरातील चीजवस्तूंचे नुकसान झाले आहे. या हानीची तीव्रता पहाता शासनाकडून भरीव मदतीची गरज आहे.त्यामुले 3 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात यावा, असेही बापट यांनी सांगितले.
740 घरांचे पंचनामे पूर्ण
नवल किशोर राम म्हणाले, जिल्हा प्रशासनाकडून बाधितांच्या घरांच्या पंचनाम्याची कार्यवाही करण्यात आली असून 740 घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये सुमारे 90 घरे पूर्णत: बाधित आहेत. पूर्णत: बाधित व अंशत: बाधित घरांच्या मदतीचा तसेच खास बाब म्हणून 3 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल.