काश्मीरवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा कट; सावधगिरीचा इशारा

0

श्रीनगर-जम्मू-काश्मीरला नेहमीच दहशतवाद्यांकडून लक्ष केले जाते. वारंवार दहशतवादी हल्ले या ठिकाणी होत असतात. सुरक्षा व्यवस्था तैनात असतांनाही अनेक वेळा हल्ले होतात. दरम्यान आता पुन्हा दहशतवादी हल्ले होण्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना हे हल्ले करतील, असेही याबाबतच्या दक्षता सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. राज्यात ११ एप्रिल ते सहा मे अशा पाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे या कालावधीत दक्ष राहण्याचा सल्ला गुप्तचर संस्थांनी दिला आहे.

भारतात हल्ले करण्यासाठी लष्करे तय्यबा, जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनांप्रमाणेच पाकिस्तानची गुप्तचर संघटना असलेल्या आयएसआयने तीन पथके तयार केली आहेत. त्यातील दहशतवाद्यांना मतदान केंद्रे, उमेदवारांना लक्ष्य करण्यास सांगण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांना स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

गृहमंत्रालय आणि निवडणूक आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये अतिरिक्त ८०० निमलष्करी दलाचे जवान पाठवण्याचा निर्णय झाला आहे. प्रत्येक मतदान केंद्र आणि उमेदवाराला संरक्षण देणे ही खरोखरच अत्यंत कसोटीची जबाबदारी असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले. त्यातही लोकसभा निवडणुकीनंतर जर विधानसभेची निवडणूक झाली तर, आणखी ११००० मतदान केंद्रांना आणि ९०० उमेदवारांना संरक्षण द्यावे लागेल. पुलवामातील दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारताने हवाई हल्ले करून दिलेले प्रत्युत्तर या पार्श्वभूमीवर पाकिस्तान निवडणूकीत व्यत्यय आणू शकतो, असा अंदाज यापूर्वीच संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. राज्यात गेल्या वर्षी झालेल्या पंचायतीच्या निवडणुकीतही दहशतवाद्यांनी काही उमेदवारांना धमकावले होते. मतदानावर बहिष्कार घालण्याचा आग्रह फुटीरतावादी गटांनी धरला होता. या पार्श्वभूमीवर, सुरक्षा दलांना दुहेरी जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. एक तर, निवडणूक प्रक्रिया आणि दुसरी म्हणजे अमरनाथ यात्रेमुळे सुरक्षा यंत्रणा अधिक लागणार आहे.