कुंभार समाजाचया शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सुशिक्षतांनी पुढे येण्याची गरज

0

उपकुलगुरू डॉ.प्रमोद माहुलीकर : रावेरला गौरव पुरस्काराचे वितरण

रावेर- कुंभार समाजात अशिक्षितांचे प्रमाण अधिक आहे, समाज जागरूक झाला पाहिजे, शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समाजातील सुशिक्षित झालेल्या लोकांनी पुढाकार घेऊन समाज उत्थानाकरीता पुढे यावे, असे मत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रमोद माहुलीकर यांनी व्यक्त केले. येथील अग्रसेन भवनात रविवारी कुंभार समाजाच्या गौरव पुरस्काराचे वितरण झाले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
तहसीलदार विजयकुमार ढगे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, कोकण विभागाचे अध्यक्ष महेश सायकर, नाशिक विभागाचे अध्यक्ष सुभाष कुंभार, कार्याध्यक्ष बबनराव जगदाळे, फेकरीचे माजी सरपंच प्रभाकर सोनवणे, प्रदेश युवा सचिव किशोर कुमार, चाळीसगाव येथील कुंभार समाजाचे विश्वस्त उत्तमराव काळे, घनश्याम हरणकार व मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी समाजातील 125 गुणवंत विद्यार्थ्यांचा याठिकाणी गौरव करण्यात आला.

विधवा महिलांच्या पाल्यांना दत्तक घेवून त्यांचे शिक्षण करणार -कापडे
कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदशेखर कापडे यांनी सांगितले की, समाजातील विधवा असलेल्या महिलांच्या पाल्यांना दत्तक घेऊन त्यांच्या 10 पर्यंतच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. घनश्याम हरणकर यांनी प्रास्ताविकातून सांगितले की,20 वर्षापासून समाज संघटन करत असून या कार्याने आज समाज जोडला गेला आहे. अज्ञान आणि अंधःकाराच्या खोल गर्तेत सापडलेल्या समाजाला बाहेर काढणे हे काम संघटनेच्या माध्यमातून होत आहे. समाजबांधवानी देखील या कार्याला बळकटी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रभाकर सोनवणे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या समाजबांधवांना संत गोरोबाकाका कार्य गौरव पुरस्कार देण्यात आला. त्यात कर्जोद येथील रामदास प्रजापती, बर्‍हाणपूर येथील गोकुळ प्रजापती, सीताराम प्रजापती, जळगावचे चंद्रशेखर काकडे, नाशिक विभागातील सुभाष पंडित, सखाराम मोरे, शामराव प्रजापती, संतोष कापडे, विजय पंडित यांना गौरवण्यात आले. सूत्रसंचालन सुरेश अर्जुन बोडसे तर आभार रवींद्र प्रजापती यांनी मानले.