मुंबई : भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असल्याचा दावा केला जात असला, तरी या विकासाची फळे सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळेच कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत भारत पहिल्या स्थानावर असल्याची आकडेवारी समोर आली आहे. असोचेम आणि ईवाय यांच्या संयुक्त सर्वेक्षणातून ही चिंताजनक माहिती पुढे आली आहे.
एकूण बालकांपैकी 50 टक्के भारतातील
भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होत असला, तरी त्याचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचत नसल्याचे असोचेम आणि ईवाय यांच्या सर्वेक्षणातून अधोरेखित झाले आहे. भारतात कुपोषणग्रस्त बालकांची संख्या सर्वाधिक असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. कुपोषणाच्या विळख्यात सापडलेल्या जगातील एकूण बालकांपैकी 50 टक्के बालके भारतातील आहेत. त्यामुळे सामाजिक असमानता दूर करण्यासाठी आणि आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी धोरणांची आखणी करणे आवश्यक असल्याचे असोचेम आणि ईवायने अहवालात नमूद केले आहे.
अहवालातील आकडेवारी काय सांगते?
2005 ते 2015 या कालावधीत भारतातील बालमृत्यूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. मात्र या काळात कुपोषणाची समस्या वाढली आहे. त्यामुळे जगातील एकूण कुपोषणग्रस्त बालकांपैकी 50 टक्के बालके भारतातील आहेत, असे अहवालातील आकडेवारी सांगते.
40 टक्के बालके कुपोषित
37 टक्के बालकांचे वजन अतिशय कमी
39 टक्के मुलांचे वजन वयाच्या तुलनेत कमी
21 टक्के मुलांचे उंचीच्या तुलनेत वजन कमी
लठ्ठपणात भारत जगात तिसरा
एकीकडे देशात कुपोषणाची समस्या तीव्र असताना लठ्ठपणाची समस्यादेखील वाढताना दिसत आहे. या यादीत भारताचा क्रमांक जगात तिसरा आहे. अमेरिकेत लठ्ठपणाची समस्या अतिशय बिकट असून त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. याशिवाय, मधुमेहाचे सर्वाधिक रुग्णदेखील भारतात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो. त्यामुळे भारतात आरोग्याच्या समस्यांनी गंभीर स्वरुप धारण केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.