कृउबा कामगाराची जळगावात आत्महत्या

जळगाव : कांचन नगरातील रहिवासी असलेल्या 48 वर्षीय प्रौढाने कृषी उत्पन्न बाजार समितीत कामाच्या ठिकाणी गळफास घेतला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रमेश सुकलाल राजपूत (48) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीतच घेतला गळफास
रमेश राजपूत हे बुधवार, 2 मार्च रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले. अन्य कर्मचार्‍यांसोबत शिलाईसाठी बारदान त्यांनी काढले. यावेळी मला जरा बरे नाही वाटत, मी आत जाऊन झोपतो, असे म्हणून रमेश राजपूत हे दुकानाच्या आतमध्ये गेले. बाकी कर्मचारी हे बाहेर बसून बारदान शिलाई करीत होते. काही वेळाने कर्मचार्‍यांच्या लक्षात आले की, रमेश राजपूत हे बर्‍याच वेळेपासून बाहेर आले नाही. सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांनी आत जाऊन बघितले असता रमेश राजपूत हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. तातडीने कर्मचार्‍यांनी त्यांना खाली उतरविले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

मुलाच्या विरहानंतर गळफास घेतल्याची चर्चा
14 जानेवारी रोजी रमेश राजपूत यांचा मुलगा यश राजपूत याने क्षुल्लक कारणावरून राहत्या घरात गळफास घेतला. या घटनेपासून यशचे वडील रमेश हे तणावात होते, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. रमेश राजपूत हे अत्यंत मेहनती आणि मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परीवार आहे.