माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे : अर्थमंत्र्यांनी लक्ष देण्याची केली मागणी
फैजपूर- अटल कृषी कार्यशाळा ही संकल्पना चांगली असून शास्वत शेती, योग्य सिंचन, चांगली बाजारपेठ जोपर्यंत शेतकर्यांच्या दरवाज्यापर्यंत येत नाही तो पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यासाठी उत्पादन मालाला योग्य भाव हा सुध्दा कायदा होणे अपेक्षित असल्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले. लघू उद्योग व्यवसाय करणार्या शेतकर्यांना शंभर टक्के प्रोत्साहन देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी केळीची शंभर टक्के नैसर्गिक आपत्त्तीमुळे हानी झाल्याचा संदर्भ देत शेजारील मध्यप्रदेश राज्यात हेक्टरी पावणे दोन लाख पर्यंत मदत तत्काळ देण्यात आल्याचे सांगत राज्यात कमीत कमी एक लाखापर्यंतची मदत तत्काळ द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मी कृषी मंत्री असतांना कृषी विभागात अनेक योजना सुरू केल्या होत्या त्या आता आर्थिक कारण देत बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगत अर्थमंत्र्यांनी यात लक्ष घालून पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणीही खडसेंनी केली. अटल महाकृषी कार्यशाळेत ते बोलत होते.