खान्देशातील 31 शाळांमध्ये उभारणार अनोखी ‘अटल टिंकरिंग लॅब’!

0

केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत उपक्रम
पुढील पाच वर्षात महाराष्ट्रातील एकूण 387 शाळांना 77 कोटी 40 लाख रूपयांचे अनुदान

मुंबई/ जळगाव(निलेश झालटे):- केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत ‘अटल टिंकरिंग लॅब’ उभारण्यासाठी देशातील आणखी 3 हजार शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये खान्देश विभागातील 5 जिल्ह्यांमधील 31 शाळांमध्ये ‘अटल टिंकरिंग लॅब’ योजनेच्या तिस-या टप्प्यात लॅब उभारण्यात येणारअसल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात जास्त 16 शाळांची निवड झाली आहे. यासोबतच धुळे (6), नाशिक (6), नंदुरबार (2) आणि जळगाव जिल्ह्यातील एका शाळेचा निवड यादीत समावेश आहे आहे.

महाराष्ट्रातील 196 शाळांचा समावेश
या मिशनच्या अंतर्गत महाराष्ट्रातील 196 शाळांचा समावेश आहे. पहिल्या दोन टप्प्यात राज्यातील 191 शाळांची निवड झाली असून राज्यात उभारण्यात येणा-या लॅबची संख्या 387 पर्यंत पोहचली आहे. ‘अटल टिंकरिंग लॅब’साठी निवड झालेल्या प्रत्येक शाळेला टिंकरिंग लॅब तयार करण्यासाठी पाच वर्षांच्या कालावधीत 20 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. यानुसार पुढील पाच वर्षात महाराष्ट्रातील एकूण 387 शाळांना 77 कोटी 40 लाख रूपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना मिळणार वाव
देशभरातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता व उद्योजकतेची जोपासना व्हावी, विद्यार्थ्यांच्या नव्या संकल्पनांना आकार देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे या उद्देशाने ‘अटल टिंकरिंग लॅब’ उभारण्यात येत आहेत. नीती आयोगाच्या ‘अटल इनोव्हेश मिशन’चे व्यवस्थापकीय संचालक रामनाथम रामानन यांनी नुकतीच याबाबत घोषणा केली होती.

पुणे जिल्ह्यातील 28 शाळांचा समावेश
महाराष्ट्रातील निवड झालेल्या शाळांमध्ये सर्वात जास्त 66 शाळा या पश्चिम महाराष्ट्रातील असून पुणे जिल्ह्यातील 28 शाळांचा यात समावेश आहे. या विभागात कोल्हापूर (17),सोलापूर (10), सांगली (6) आणि सातारा जिल्ह्यातील 5 शाळांची निवड झाली असल्याची माहिती शिक्षण विभागातून मिळाली आहे.