कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कर्मचारी रमेश पोळकर यांनी महापालिका अधिकार्यांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा तसेच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्यांनी हल्ला केला होता. त्याला पोलीस प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत महापालिका मुख्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या सगळ्या प्रकरणाची तक्रार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे केली असून न्याय मिळत नसल्याने आत्मदहन करुन जीवन संपविण्याची परवानगी द्यावी अशीही मागणी न्यायाधीशांकडे केली असल्याचे पोळकर यांनी सांगितले. पोळकर यांनी मुख्यालयात ठिय्या आंदोलन केल्यावर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पोळकर यांना ठिय्या मागे घेण्याबाबत विनंती केली. मात्र पोळकर यांनी नकार दिला.
अंगावर फेकला पेपरवेट
पोळकर यांनी सुरक्षा अधिकारी सुहास खेर यांच्यासह अन्य सहकार्यांनी त्यांचा छळ केला आहे. त्यांना मानसिक त्रास दिला आहे. मानसिक त्रस देणार्यांना प्रशासनाने पाठिशी घातले जात असल्याचा आरोप यावेळी केला. त्याचबरोबर राज्यमंत्री चव्हाण यांनी सावकर उद्यानात थाटलेले जाणता राजा नावाचे कार्यालय बेकायदेशीर असल्याची तक्रार केली होती. मात्र पालिका प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही. याची विचारणा करण्यासाठी उपायुक्त सु.रा.पवार यांच्याकडे गेलो असता त्यांनी माझ्या अंगावर पेपरवेट फेकून मारला असेही पोळकर यांनी सांगितले.
आत्मदहनाची परवानगी द्या
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह त्यांच्या पदाधिकार्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. या सगळ्या तक्रारीप्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेतली असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहेत. न्याय मिळत नसल्याने त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी आत्मदहन करुन घेण्यास परवानगी द्यावी असे पोळकर यांनी म्हटले आहे.