त्यास्तव कष्ट वा श्रम मग ते कोणतेही असो ते मनापासून करावे. वरवर केलेल्या कामात आनंद तर मिळत नाहीच तसेच त्याचे फळही मिळत नाही. मनातून केलेल्या कामाचा कुणालाही बोजा वाटत नाही. मात्र, तेच काम अनिवार्य किंवा बंधनात टाकले की कधी एकदा संपते असे वाटते. उदा. शाळेतील मुलांना त्यांच्या आवडीनुसार अभ्यासाचे किंवा इतर काम लावल्यास ते त्यात तल्लीन होऊन काम करतात. याउलट हे काम केलेच पाहिजे असा हेका धरल्यास किंवा बंधन टाकल्यास तो अभ्यास किंवा इतर काम त्याला कंटाळवाणे व नीरस वाटते. एखादे काम सुरू करण्यापूर्वी त्याचे ध्येय ठरवणेसुद्धा गरजेचे आहे. ध्येयाविना काम करणे म्हणजे ढोरासारखे काम करण्यासारखे आहे. त्यामुळे उचित ध्येयप्राप्तीसाठी नियोजनपूर्वक केलेले कामच यशस्वी होऊ शकते. त्यासाठी सर्वप्रथम कामाचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरते. शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना या नियोजनाची ओळख झाली तर त्यांचे प्रत्येक काम यशस्वी होताना दिसून येते. बहुतांश विद्यार्थी दहावी वा बारावीच्या परीक्षा तोंडावर आली किंवा त्या वर्षी भरपूर मेहनत घेतात, अभ्यास करतात, सरावसुद्धा भरपूर करतात. मग अशा विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळेल असे सांगता येईल काय? कारण तहान लागली म्हणून विहीर खणण्यापेक्षा आपणास कधी तरी तहान लागणार आहे म्हणून जो आधीच विहीर खणून ठेवतो त्याची खर्या अर्थाने तहान भागते. त्यास्तव फक्त महत्त्वाच्या वर्षी अभ्यास करून चालणार नाही. त्यासाठी प्रारंभीपासून अभ्यासाचे नियोजन केल्यास कमी श्रमात नक्कीच यश मिळू शकते. मनात नुसते संकल्प वा स्वप्नाचे महल बघितल्यास आपले कोणतेच मनोरथ पूर्ण होणार नाही. दे रे पलंगावरी भावनेतून आपण विचार करत असू तर ते आपल्या जीवनासाठी नक्कीच घातक आहे. त्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहणे अत्यंत गरजेचे आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे की, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तोचि देव जाणावा. प्रयत्न करा, कार्य करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. प्रयत्न केल्यास वाळूतूनदेखील तेल गळू शकते. त्यासाठी सर्वप्रथम स्वतःची कामे स्वतः करायला शिकणे महत्त्वाचे आहे.
कुटुंबात वावरताना एक बाब प्रकर्षाने जाणवते, लहान असलेली मुले त्यांना कसल्याच प्रकारच्या कामाची जाणीव नसताना आपण मुलांची आणि मुलींच्या कामाची विभागणी करतो. घरामध्ये एखादा मुलगा ज्याला कामाची काहीच कल्पना नाही असा तो झाडू घेऊन घर साफ करत असेल तर घरातील आईं किंवा जे कोणी श्रेष्ठ असतील ते नकळत म्हणून जातात, अरे ते झाडू ठेव बाजूला, ते तुझं काम नाही. अशा अनुभवातून मग मुलांच्या आणि मुलींच्या कामाचे वर्गीकरण सरळ आपल्या घरापासून जे सुरू होते ते देशाच्या संसदेच्या दारापर्यंत जाऊन पोहोचते. कोणत्याही कामाची अंगवळण जर टाकायचे असेल तर त्यांना सर्व प्रकारची कामे देणे वा सांगणे गरजेचे आहे. घरातील केर साफ करणे, भाजी निवडणे, सांडपाणी भरणे, अंथरुण टाकणे व त्याचा घड्या करणे, आंघोेळीसाठी पाणी गरम करणे, छोटे कपडे धुणे, कपड्यास इस्त्री करणे, दुकानातून सामान आणणे, बाजारातून भाजीपाला आणि वर्त्तमानपत्र आणणे, इत्यादी सर्व कामे वर्गीकरण न करता घरातील मुलां-मुलींना लावल्यास त्यांच्यात या कामाच्या बाबतीत विभागणी होणार नाही. ज्या घरात फक्त मुलगा किंवा मुलगीच असेल तर त्या घरात कामाचे वर्गीकरण करता येते काय ? नक्कीच नाही. या लहानपणाच्या वयात जर मुलांना कामाच्या बाबतीत स्वावलंबी बनविलो तरच त्याचे दूरगामी चांगले परिणाम निश्चितपणे बघायला मिळतात. याबाबतीत भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे जीवनचरित्र वाचले तर लक्षात येते की, त्यांनी जीवनात काम वा श्रमाला महत्त्वाचे पहिले स्थान तर दिलेच शिवाय ते स्वतःची कामे स्वतः पूर्ण करण्यात धन्य मानत म्हणूनच तर ते भारताच्या महत्त्वपूर्ण अशा पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू शकले.
भगवान गौतम बुद्ध यांनी आळस हा माणसाचा शत्रू आहे असे म्हटले आहे. जी माणसे कष्टाळू आणि मेहनती असतात त्यांना रिकामा वेळच मिळत नाही. सदा न कदा ते कामात व्यस्त असतात, तर त्याउलट आळशी माणसे एक तर काम करत नाहीत आणि करणार्या व्यक्तीला करू देत नाहीत. म्हणून अशा लोकांपासून चार हात दूर राहणे केव्हाही चांगले असते. रिकाम्या डोक्यात भूताचा वास असतो. काही काम नसले की नसती उठाठेव केली जाते जे की जीवनाच्या प्रगतीत खुप मोठे अडसर ठरते. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्ती पर्यंत प्रत्येकाचे कष्ट करण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. लहान मुलांचे कष्ट म्हणजे आपला शाळेतील अभ्यास वेळेवर पूर्ण करून घरकामात आई-बाबांना मदत करणे. घरातील लहान सहान कामे स्वयंस्फुर्तीने पूर्ण करणे, काम करणार्या लोकांविषयी मनात आदर ठेवणे आवश्यक आहे. कोणतेही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असूच शकत नाही. प्रत्येक काम आपणास काही तरी देऊन जातो. बहुतांश ठिकाणी शालेय वयातील मुले हॉटेलमध्ये किंवा इतरत्र काम करताना दिसून येतात. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते अगदी लहान वयात कष्ट करण्यास सुरु करतात. त्यामुळे फार कमी वयात वयस्कर वाटतात. ज्या वयात जे काम करायला हवे तेच काम केल्यास शरीर सुध्दा साथ देते. बालमजूरी प्रतिबंधक कायदा असुन देखील बाल कामगारांची संख्या अजुन देखील कमी झाले नाही. नोकरी करणार्या कर्मचारी मंडळीनी प्रामाणिकपणे आपले काम पूर्ण करणे हेच त्यांचे खरे कष्ट आहे. मात्र काही कर्मचारी लवकरात लवकर श्रीमंत व्हावे म्हणून पैश्याच्या हव्यासा पायी लाच घेतात.
अश्या लोकांना कष्ट करून कमाविलेल्या पैश्यासारखे या पैश्याची किंमत कळत नाही. वाटेल तसे पैश्याची उधळपट्टी केल्या जाते. त्यामुळे यांच्या घरातील संस्कार सुध्दा लुप्त होतात आणि त्यांची येणारी पिढी निष्क्रिय निघते. कारण त्यांना श्रमाचे महत्त्व कळलेले नसते. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा असलेल्या लोकांनाच श्रमाचे महत्त्व कळलेले असते म्हणून तर त्यांना चटणी भाकर देखील गोड लागते आणि इकडे खाण्यास सर्व काही असुन मधुमेह किंवा विविध कारणामुळे ते खाऊ शकत नाहीत. एकीकडे पोटासाठी पायपीट होते तर दुसरीकडे खालेले पचवण्यासाठी सकाळ-संध्याकाळ पायपीट करावी लागते. प्रत्येक जण कामाची टाळाटाळ करीत असेल तर भावी आयुष्य कसे असेल? याचा विचारदेखील फारच कठीण वाटते. म्हणून उभ्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी असो वा इतर छोटे मोठे काम करणारे कामगार यांच्याविषयी त्यांच्या श्रमाचे मोल पैश्याच्या मापामधून न बघता कधी तरी माणुसकीच्या नात्यातून पाहायला शिकणे अत्यंत महत्वाचे आहे असे वाटते. महात्मा गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही कामाची सुरुवात स्व म्हणजे आपल्यापासून करावी. आपण एक जण पुढे पाऊल उचला हजारो पाय तुमच्या सोबत येतील.
समर्थ रामदास स्वामी यांनी कष्टाची महती सांगताना ’कष्टेविना नाही फळ’ असे स्पष्टपणे सांगितले आहे. सर्व काही जागेवर विनासायास मिळावे अशीच प्रत्येकाची अपेक्षा बनत चालली आहे. समाज मनाची ही स्थिती बदलण्यासाठी लहानपणापासून ते मोठे होईपर्यंतच्या कष्टाच्या गोष्टी वदवून घेऊन संस्कार करण्याचे प्रयत्न होतात. परंतु, प्रत्यक्ष कृती मात्र शून्य असते. बर्याच जणांना कसल्याच प्रकारचे कष्ट न करता आपले पोट भरले जावे असे वाटते.
यात बिनभांडवली धंदा म्हणजे भीक मागणे. शरीर धडधाकट असूनदेखील अनेक जण भीक मागताना दिसतात. कष्ट करणे जीवावर येत असल्याने दुसर्यास मागून खाणे, दुसर्यांसमोर मदतीसाठी हात पसरणे हाच त्यांचा दिनक्रम असतो. सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जसे की रेल्वे स्टेशन, बसस्थानक किंवा एखादे धार्मिक स्थळ ही त्यांची ठरवलेली ठिकाण आहेत. जेथे भिकार्याचा वावर सर्वात जास्त होतो. या बाबीचा त्रास प्रवाशांना आणि भाविकांना होतो. पण यावर काही उपाययोजना होत नाही. हे विदारक चित्र पाहून मन विषण्ण होते. यातील काही जण खरोखरंच अपंग असतील ही वा काही जणांना काहीच करता येत नाही. पण अशांची संख्या फार कमी आहे. यापेक्षा धडधाकट भिकार्यांची भरणा अधिक असतो. अशा लोकांना भीक देऊन आपण एकप्रकारे त्यांच्या या व्यवसायाला प्रोत्साहन देत असतो, असे नाही का वाटत? परीक्षेत कॉपी करून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी विनाकष्टाचे फळ मिळावे, अशी अपेक्षा करणार्याचे आणखी एक उदाहरण. लॉटरीने नशीब खुलते म्हणून घरातील एक-एक भांडी-कुंडी विकून केवळ लॉटरी खेळणारे अनेक महाभाग सापडतात. कष्ट करण्याची जणू त्यांची काहीच तयारी नाही असेही काही जण समाजात भेटतात. सामान्यांची अशी वृत्ती का व्हावी याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. फुकटची मिळवण्याची वृत्ती सोडून प्रत्येकाने कष्टाची सवय लावून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज जागतिक कामगार दिन त्यानिमित्त काम करणार्या व्यक्तीविषयी आपल्या मनात आदर निर्माण होणे अत्यावश्यक आहे.
– नागोराव सा. येवतीकर
सामाजिक कार्यकर्ते ता. धर्माबाद
9423625769