कॉलेजच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी!

0

खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांत बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आल्याचा आदेश शिक्षण विभागाने जारी केल्याची बातमी नुकतीच वाचण्यात आली. सरकारला उशिरा का होईना या बाबीची जाणीव झाली की, कॉलेजमध्ये हजेरीवर जेवढे विद्यार्थी असतात त्यांच्या निम्यापेक्षा कमी विद्यार्थी उपस्थित असतात, असे कॉलेजचे चित्र एकीकडे दिसते तर दुसरीकडे खासगी क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा मिळत नाही. मुले मिळेल त्या जागेवर बसून किंवा उभे राहून शिकवणी पूर्ण करून घेतात. कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थित आणि अनुपस्थितीवर कोणाचेही अंकुश नसल्यामुळे येथील प्राध्यापक मंडळी विनाकष्ट वेतन उचलतात, तर खासगी क्लासेसमध्ये अव्वाच्या सव्वा पैसे भरून पालक मंडळींची आर्थिक स्थिती कोलमडते. जे विद्यार्थी खूप गरीब आहेत त्यांना मात्र कोणतीही शिकवणी लावल्या जात नाही आणि कॉलेजमध्ये कोणी शिकवत नाही. त्यामुळे त्यांचे खूप बेहाल होतात. गरीब विद्यार्थी जन्मतः हुशार असूनदेखील मागे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कॉलेजशी संपर्क करून काही क्लासेसवाले आर्थिक हितसंबंधसुद्धा तयार करतात. विज्ञान शाखेतील विद्यार्थी फक्त प्रात्यक्षिक परीक्षेस उपस्थित राहतात, ही बाब शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्याचा निर्णय गरीब विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप छान आहे. मात्र, येथे ही एक धोका संभवतो. ते म्हणजे मुले अंगठे लावून परत त्यांच्या क्लासेसला हजेरी लावू शकतात. मुले कॉलेजमध्ये उपस्थित असल्याचा पुरावा बायोमेट्रिक देईल. या बायोमेट्रिकमध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता शासनाला वाटते. म्हणजे येथेही पळवाट निघू शकते. त्यामुळे या बायोमेट्रिक प्रणालीसोबत जर प्रत्येक वर्गखोल्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सक्ती केल्यास कोणत्या शिक्षकांनी काय शिकवले आणि त्यांच्या या शिकवणीला किती विद्यार्थी उपस्थित होते याची रेकॉर्डिंग पाहायला मिळेल. यात काही भ्रष्टाचार होण्याची शक्यता धूसर आहे असे वाटते. त्याच यासोबत असे केल्यामुळे जे गरीब विद्यार्थी कुठेही क्लासेस लावू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना शिकवणीचा फायदा होईल. पुन्हा एकदा कॉलेजमधून मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले चित्र पाहायला मिळेल. या ठिकाणी शिक्षक आणि विद्यालय प्रमुख या दोघांचीही कसोटी लागते. असे झाले तरच या खासगी क्लासेसवर अंकुश राहील, असे वाटते. शालेय शिक्षण विभागाने घेतलेला हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे.

नागोराव सा. येवतीकर
सामाजिक कार्यकर्ते ता. धर्माबाद
9423625769