रावेर: सध्या जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतातही याचा शिरकाव झाला आहे. प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली आहे. सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. दिल्लीतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात तसेच मोठ-मोठ्या रुग्णालयात कोरोनासाठी विशेष कक्ष सुरु करण्यात आले आहे. दरम्यान बुऱ्हानपूर येथील जिल्हा रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कोरोना कक्षात कोरोना असलेला रुग्ण आला तर काय करावे? यासाठी तालीम सुरु होती. त्यासाठी रुग्णवाहिकेतून एका रुग्णाला आणण्यात आले, रुग्णाला कक्षात आणताच इतर रुग्ण पलंगावरून गायब झाले. रुग्णच काय तर रुग्णालयातील कर्मचारी देखील पळाले. मात्र हा खरोखर कोरोनाचा रुग्ण नव्हता तर केवळ तालीम सुरु होती. तालीम सुरु असल्याने कळल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.