कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रिक्षात पारदर्शक पडदे लावण्याचे आवाहन

जळगाव- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षात पारदर्शक पडदे लावण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे. या सूचनांचे पालन न करणार्‍या रिक्षाचालकांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
सध्या अत्यावश्यक सेवेकरीता रिक्षातून कमाल दोन प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्गावर परिणामकारकरित्या प्रभावी पद्धतीने आळा घालण्याकरिता या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी सर्व रिक्षाचालकांची तसेच प्रवाशांची सुद्धा आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व प्रसार पूर्णपणे रोखणे अत्यावश्यक आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाकडून विविध मोहिम व बंधने घालण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व रिक्षाचालकांनी रिक्षांमधील प्रवासी व चालक यांच्यात संसर्ग होऊ नये, याकरीता त्यांच्या रिक्षांमध्ये चालक केबीन व प्रवाशांना बसण्याची जागा, या दरम्यान फायबर किंवा प्लास्टीक अथवा इतर पारदर्शक पडद्याने विभाजन करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील सर्व रिक्षाचालकांनी याप्रमाणे रिक्षामध्ये सुधारणा करुनच प्रवासी वाहतूक करावी. या सूचनेचे पालन जे रिक्षाचालक करणार नाहीत, त्यांच्या विरुद्ध 16 मे 2021 पासून मोटार वाहन कायदा 1988, आपत्ती व्यवस्थापन कायदा, सन 2005 व भारतीय दंड संहिता अधिनियमातंर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिला आहे.