कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स

0

मुंबई!कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन आणि सरकार दोन्ही चिंतेत आहे. करोनाचा प्रादुर्भाव मुंबईसह महाराष्ट्रात वाढतानाच दिसतो आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र्रातील करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स नेमण्यात येणार आहे अशी घोषणा केली आहे.

कोविड १९ विरोधातला लढा आणखी प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे टास्क फोर्स नेमण्यात येणार आहेत. या टास्कफोर्समध्ये डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ यांचा समावेश असणार आहे. कोविड -१९ नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपचार , उपाययोजना त्याचप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणे व त्यांचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरावर हा टास्कफोर्स काम करेल.

जिल्ह्याधिकाऱ्यांना अशा प्रकारचे टास्क फोर्स नेमण्याबाबत कळवण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिले आहेत.

राज्यात सध्या साथरोग अधिनियम १८९७ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात येत असलेल्या या नव्या टास्क फोर्सच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करता येईल असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.