नवी दिल्ली: देशातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे. त्यातच ‘हर्ड इम्युनिटी’ हा एक पर्याय समोर आला आहे. मात्र आरोग्य मंत्रालयाने करोनाला रोखण्यासाठी ‘हर्ड इम्युनिटी’वर अवलंबून राहता येणार नाही असे स्पष्टीकरण देत लस हाच करोनावर मात करण्याचा मार्ग असल्याचे सांगितले आहे. आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे.
हर्ड इम्युनिटी लोकसंख्येला आजारापासून वाचवते पण लस तयार होईल तेव्हाच हर्ड इम्युनिटी तयार होईल किंवा नागरिकांना करोनाची लागण होऊन ते त्यातून बरे झाले, तर हर्ड इम्युनिटी तयार होते. भारतासाठी हर्ड इम्युनिटी पर्याय असू शकत नाही. लस दिल्यानंतरच हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते” असे आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मुंबई, पुण्यासारख्या शहरात हर्ड इम्युनिटीचा पर्याय असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर हर्ड इम्युनिटीची चर्चा सुरु झाली आहे.
नुकत्याच एका सर्वेक्षणात तब्बल ५७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचे समोर आले आहे. निती आयोग, मुंबई महानगरपालिका, टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) यांच्यावतीने आर उत्तर (दहिसर), एम पश्चिम (चेंबूर)आणि एफ उत्तर (माटुंगा) या भागांत जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये रॅन्डमली पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले.