पिंपरी: सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. मात्र आरोग्य आणि पोलीस प्रशासन आपल्या जीवाची पर्वा न करता दररोज सेवा देत आहे. परंतु त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. पोलीस रस्त्यावर उतरून सेवा देत आहेत. याकाळात ते सार्वजनिक स्वच्छता गृहाचा वापर करत आहेत. मात्र पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृहात मोठ्या प्रमाणात अस्वछता असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याकडे महापालिकेने लक्ष देणे आवश्यक असून शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची दिवसातून चारवेळा निर्जंतुकीकरण व्हावे अशी मागणी इसीएचे चेअरमन विकास पाटील आणि अँटी कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण यांनी केली आहे. याबतचे पत्र त्यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहे. स्वच्छता गृहांचे निर्जंतुकीकरण होत नसेल तर ते बंद करण्यात येऊन पोलिसांसाठी फिरते स्वच्छता गृहांची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. सध्या उन्हाळा असून पिण्याच्या पाण्याची अधिक आवश्यकता आहे. त्यासकडे देखील पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.