नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. चीनपाठोपाठ सर्वच देशात आता कोरोनाच फैलाव झालेला आहे. भारतात करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारताने पुढचे काही दिवस स्वत:ला जगापासून वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य आणि हवाई मंत्रालयाने सूचना जारी केली आहे. सूचनेच्या अंमलबजावणीनंतर भारत पुढचा महिनाभर संपूर्ण जगापासून स्वत:ला विलग आणि सुरक्षित ठेवणार आहे. हे निर्णय १३ मार्चच्या रात्रीपासून लागू होतील. विशेषबाब म्हणजे सरकारच्या या निर्णयानंतर काही वेळातच डब्लूएचओने करोना व्हायरला दुर्धर रोग असल्याचे घोषित केले आहे. या महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेवर देखील याचा परिणाम होणार आहे. परदेशी खेळाडूंना दूर ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
भारताने जगातल्या कोणत्याही देशातून येणाऱ्या नागरिकांसाठी व्हिसा १५ एप्रिलपर्यंत स्थगित केले आहे. केवळ संयुक्त राष्ट्राशी निगडीत कर्मचारी, डिप्लोमॅटिक प्रकरणे आणि सरकारी प्रोजेक्टशी निगडीत अधिकाऱ्यांसाठी ही स्थगिती नसणार आहे. खूप महत्त्वाचे काम असेल तर अशा वेळी भारतीय मिशनकडून विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. या निर्णयानंतर परदेशी नागरिकांना भारतात पर्यटनासाठी किंवा इतर कामकाजासाठी येणे कठिण होणार आहे.