कौटुंबिक वादातून जावयाने केली चार जणांची हत्या

0

इचलकरंजी : शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे कौटुंबिक वादातून जावयाने चार जणांची हत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली असून कुटुंबातल्या मायलेकी जावयाने केलेल्या हल्ल्यात जागीच ठार झाल्या तर अन्य दोन गंभीर जखमींचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान हल्लेखोर जावयाला पोलिसांनी अटक केली आहे.

धुमाळ कुटुंबात हे हत्याकांड घडलं असून कौटुंबिक वादातून धुमाळ कुटुंबातल्या दोन मुलींपैकी एकीचा नवरा प्रदीप जगताप याने रागाच्या भरात यंत्रमागाच्या लाकडी माऱ्याने कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. प्रदीप याच्या सासूबाई व त्याची मेहुणी या दोघी जागीच ठार झाल्या. प्रदीप याची पत्नी व मेहुणा गंभीर जखमी झाले होते. त्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारांदरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

छाया श्रीपती धुमाळ-आयरेकर, सोनाली अभिजीत रावण, रोहित श्रीपती धुमाळ व रुपाली धुमाळ अशी मृतांची नावे आहेत. यड्राव येथील शिरगावे मळ्यात ही घटना शनिवारी मध्यरात्री च्या सुमारास घडली. हल्लेखोर प्रदीप विश्वनाथ जगताप ( मूळ राहणार कवठेगुलंद जि. सांगली ) हा फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथके रवाना झाली होती. त्याला पोलिसांनी अटक केली. त्याने यंत्रमागाच्या लाकडी माऱ्याने घाव घालून खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन झाले आहे.