शिरपूर:तालुक्यातील खारीखाण येथे क्वारंटाईन उसतोड मजूर दाम्पत्याला स्वतःच्या गावात प्रवेश करण्यास विरोध करत जमावाने लाठ्या काठ्यांनी मारहाण करत गावात प्रवेश केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली.दरम्यान, याप्रकरणी खारीखाण येथील ६ जणांविरुद्ध शिरपूर तालुका सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील खारीखाण येथील उसतोड मजूर दाम्पत्य सांगली जिल्ह्यात उसतोडीसाठी गेले होते.काही आठवड्यांपूर्वी शासनाच्या आदेशाने मजुर दामपत्यांना शिरपूर तालुक्यात परत आणले.मात्र या दाम्पत्याची वैद्यकीय तपासणी करून खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला. गावात भिती पसरु नये म्हणून हे दाम्पत्य १४ दिवस शेतात क्वारंटाईन राहिले. यानंतर कालावधी पुर्ण झाल्याने हे दाम्पत्य स्वतःच्या घरी आले. मात्र, गावातील जमावाने त्यांना गावात येण्यास विरोध केला. दाम्पत्याने आम्हाला कोरोना झालेला नसल्याचे समजवून सांगितले. मात्र, जमावाने काही एक न ऐकता जमावाने या दाम्पत्याला लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. तसेच गावात प्रवेश केल्यास ठार मारू, अशी धमकी दिली. मारहाणीत दाम्पत्य गंभीर जखमी झाले.