जळगाव । शासनाने विविध उपक्रम राबवित पाणी बचतीचा संदेश घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र पिंप्राळा परिसरातील खंडेराव नगरापासून अर्धा किलो मिटर अंतरावर असलेली आणि जळगाव शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी गेल्या पंधरा दिवसापासून फुटलेली आहे. प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्याने जलवाहिनीतून दिवस रात्र लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. तसेच जलवाहिनीची वेळीच दुरुस्ती न झाल्यास येणार्या काळात पाणी टंचाईला सामना करावा लागणार आहे. खंडेराव नगर जवळील पॉवर हाऊस पासून अर्धा किलोमिटर अंतरावर ही जलवाहिनी आहे. ज्या परिसरात जलवाहिनी फुटली आहे त्याठिकाणी नागरिक शौचास जात असतात. त्यामुळे आजार पसरण्याची शक्यता आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
गेल्या पंधरा दिवसापासून शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली आहे. फुटलेल्या जलवाहिनीतून वाया जाणार्या पाण्याचा प्रवाह मोठा असून फुटलेल्या जलवाहिनी परिसरात नागरिक शौचविधीसाठी देखील जात असतात त्यामुळे नागरिकांना दुषीत पाण्याद्वारे होणारे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.