मुंबई: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर सातत्याने भाजपवर टीका करत आहेत. भाजपच्या राज्यातील नेतृत्त्वावर खडसे वारंवार टीका करत आहे. त्यातच भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड आणि खडसे यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. ट्वीटरवरून आज बुधवारी सकाळी प्रसाद लाड यांनी खडसेंवर निशाणा साधला आहे.
“जनतेने मला सलग सहा वेळा निवडून दिले, प्रसाद लाड यांनी किमान एकदा तरी जनतेतून निवडून येऊन दाखवावे, असे थेट आव्हान खडसे यांनी दिले होते. त्याला आता प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘खडसे यांची स्वतःची एवढी ताकद होती, तर स्वतःच्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत?,’ असा सवाल त्यांनी केला आहे. ‘मी नक्कीच ७ वेळा निवडून येईन याची मला खात्री आहे, असा दावा देखील लाड यांनी केला आहे.
आजवरच्या राजकारणात भाजप संघटन आणि रा.स्व.संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत. तरीही पक्ष नेतृत्वाला दोष देऊन पक्ष त्याग केला.ज्या पक्षाने एवढं दिलं,अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पद उपभोगली,तेच नेते आता इतरांना शिकवत आहेत.@EknathGKhadse
— Prasad Lad (@PrasadLadInd) November 18, 2020
‘आजवरच्या भाजपा आणि रा.स्व.संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत. तरीही पक्ष नेतृत्वाला दोष देऊन पक्ष त्याग केला. ज्या पक्षाने एवढे दिले, अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पडे उपभोगली, तेच नेते आता इतरांना शिकवत आहेत,” असा टोलाही आमदार प्रसाद लाड यांनी लगावला आहे.