अमळनेर। शहरातील तांबेपुरा भागाकडे जाणार्या विप्रो कंपनी जवळील रेल्वे बोगद्याखाली साचलेल्या पाण्यात अमळनेर आगाराची बस बंद पडल्याने तब्बल दोन तास प्रवाशी अडकून पडले होते. 35 विद्यार्थ्यासह प्रवाशांचा यात समावेश होता. पावसामुळे खड्यात पाणी साचल्याने अमळनेर-करणखेडा बस (एमएच 07-सी 7828) या बसच्या वाहन चालकास खड्याचा अंदाज आला नसल्याने बस खड्यात अडकली. क्रेनच्या साहाय्याने ही बस पाण्यातून बाहेर काढण्यात आली.
पावसाळ्याच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची सोय नसल्याने बोगद्याखाली नेहमी पाणी रेल्वे साचते. बोगद्याखाली पाणी साचल्याने विद्यार्थी व प्रवासी यांना बस मधून खाली उतरता येत नव्हते त्यामुळे प्रवाशी बोगद्यात अडकून पडले होते. तहसीलदार प्रदीप पाटील आणि नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी ताबडतोब पोलिसांना व नगरपालिका कर्मचार्यांना घटनास्थळी पाठविले. माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. रेल्वेची क्रेन मागवून पोलिसांच्या मदतीने बस बोगद्यातून बस बाहेर काढण्यात आली. पोलीस सुनील हटकर , प्रमोद बागडे, जे डी पाटील, प्रमोद पाटील, बापू रंगराव पाटील, यांच्यासह तांबेपुरा परिसरातील नागरिकांनी बस पाण्यातून बाहेर काढण्यासाठी मदत केली.