मुंबई । दरवर्षी गणेशोत्सवात मुंबईहून कोकणात जाणार्यांची संख्या बरीच असते. यंदाच्या वर्षीही अनेक जण गणेशोत्सवाच्या दरम्यान कोकणात किंवा आपापल्या गावी जायला निघत आहेत. अशा वेळी रेल्वे आणि राज्य परिवहन बससेवा अर्थात एसटी महामंडळाच्या बसगाड्याही तितक्याशा अपुर्या पडतात. अशा वेळी कोकणात जाणारी चाकरमानी खासगी बसगाड्यांचा वापर करत असतात. खरे तर बस आणि रेल्वे सेवेवर प्रवाशांचा दरवर्षी ताण येत असतो. म्हणून यावर्षी कोकणासाठी व राज्यातील इतर काही भागांत जादाच्या बसगाड्या आणि रेल्वे सोडण्यात आल्या. तरीही बुकिंग फुल असल्याने प्रवाशांना आता खासगी बसगाडीचा पर्याय निवडावा लागतो आहे. मात्र याच संधीचा फायदा घेऊन खासगी बस प्रवाशांनी प्रवाशांना अव्वाच्या सव्वा प्रवासी भाडे आकारून त्यांची आर्थिक लूट करण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर गणेशोत्सवात मुंबईतून कोकणात जाणार्यांची संख्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जास्त आहे. या सगळ्यांकडून 30 ते 40 टक्के जास्त पैसे खासगी बसवाल्यांकडून घेण्यात येत आहेत.
न्यायालयाचे आदेशही धाब्यावर बसवले
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात जाण्यासाठीही 20 ते 30 टक्के जादाचे भाडे या खासगी बसवाल्यांनी लावले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात ट्राफिक, तसेच परत येणार्या रिकाम्या गाड्या आणि गाड्यांना लागणारे डिझेल याची भरपाई भरून काढण्यासाठी ही भाववाढ केल्याचे खासगी बसच्या मालकांचे म्हणणे आहे. परंतु, ज्यांचे गावाला जायचे नियोजन अचानक झाले, अशा प्रवशांना मात्र खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. खरे तर न्यायालयाने सरकारला या खासगी बसच्या या ऐन सणासुदीच्या वेळी वाढवण्यात येणार्या दरांवर लगाम लावावा, असे सांगण्यात आले होत. मात्र, सरकारकडूनही अद्याप असे नियंत्रण लावता आले नाही.
खासगी बसचे दर किती वाढले आहेत?
मुंबई ते रत्नागिरी (एसी) 1600 ते 1800रु. (नॉन एसी) – 800 ते 1000 रु. मुंबई ते सावंततवाडी – (एसी स्लीपर) -1800 ते 2000 (नॉन एसी सिटिंग) – 1000 ते 1200 मुंबई ते चिपळूण (एसी) – 1300 ते 1500 (नॉन एसी) – 800 ते 1000 मुंबई ते कणकवली (एसी) -1600 ते 1800 (नॉन एसी) – 1000 ते 1200 मुंबई ते गोवा (एसी) – 2300 ते 2500.