वाकड येथील एका खासगी शाळेकडून गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप
आम आदमी पार्टीच्या पदाधिका-यांच्या नेतृत्वाखाली पालकांनी केले आंदोलन
पिंपरी : वाकड येथील एका खासगी शाळेकडून गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप करत या शाळेवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या पदाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली पालकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभागासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. तसेच शाळेची चौकशी करण्यासाठी पालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे. पालिकेने तातडीने त्या शाळेवर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही आंदोलक पालकांनी केली. या शाळेत जर असे प्रकार घडत असतील तर ती शाळा तर बंद केली पाहीजे, किंवा या प्रशासनाला शिक्षा करण्यात आली पाहिजे, अशा भावना या पालकांनी व्यक्त केल्या आहेत. शिक्षक हे गुरू असतात. मात्र असे गुरू मिळाल्याने मुलांचे काय भले होणार, मुले कशी पुढे जातील, असे प्रश्न या पालकांच्या मनात निर्माण झाले आहेत.
तोपर्यंत हलणार नाही
पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयातील दुसर्या मजल्यावरील शिक्षण विभागासमोर पालकांनी मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून ठिय्या मांडला आहे. पालिका अधिकार्यांनी याकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. त्यामुळे भविष्यात असा त्रास कोणी देणार नाहीत. एकाला शिक्षा झाली तर बाकिच्यांना असे न वागण्याचा धडा मिळेल. महापालिका जोपर्यंत ‘शाळेवर फौजदारी कारवाई करत नाही, तोपर्यंत आम्ही हलणार’ नसल्याची भुमिका पालकांनी घेतली. या आंदोलनात आम आदमी पार्टीचे राज चाकणे, प्रवक्ते मुकुंद किरदत, पुणे जिल्हा संघटक राजेश चौधरी, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन बेंद्रे, अय्याज सय्यद, महेश बडगिरे, अॅड. उमेश साठे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष बसवराज कणजे आणि पालक पुनित शर्मा, राकेश मठिया सहभागी झाले आहेत.
शैक्षणिक शुल्कावरुन वाद
आम आदमीचे पुणे जिल्हा संघटक राजेश चौधरी म्हणाले की, वाकड येथील एक खासगी शाळा आणि पालकांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून शैक्षणिक शुल्कावरुन वाद सुरु आहे. त्याविरोधात पालक आवज उठवित आहेत. कायदेशीर कारवाई करु शकत नसल्याने शाळेकडून काही विद्यार्थ्यांना सापत्नपनाची वागणूक दिली जात आहे. विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केला जात आहे. विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला जात आहे. विद्यार्थ्यांना केवळ एक ते दीड तासच वर्गात बसू दिले जात आहे. पिंपरी महापालिकेच्या शिक्षण विभागाने या शाळेवर कारवाई करणे अपेक्षित असताना प्रशासन कारवाईस टाळाटाळ करत आहे.
महापालिकेने केवळ शाळेला नोटीस दिली आहे. परंतु, पुढे त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. केवळ चौकशी सुरु असल्याचे सांगितले जाते. चौकशी करण्यास एवढा कालावधी कशासाठी लागत आहे? प्रशासनाने तातडीने शाळेवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी चौधरी यांनी केली. शिक्षण विभाग जोपर्यंत या मनमानी करणार्या शाळेवर फौजदारी कारवाई करत नाही. तोपर्यंत आम्ही उठणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.