पालघर । पालघरचे खासदार अॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनाने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा, आदिवासींचा कैवारी, अभ्यासु खासदार, ज्येष्ठ आणि समर्पित असे नेतृत्व हरपले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. खासदार अॅड. चिंतामण वणगा यांचे मंगळवारी दिल्ली येथे निधन झाले. मुळगावी कवाडा, येथे वनगा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, गुजरातचे आदिवासी विकास राज्यमंत्री रमण पाटकर, सिल्व्हासाचे खासदार नटुभाई पटेल, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वनगांची समाजकारणात स्वतंत्र ओळख – मुख्यमंत्री
यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री म्हणाले की, खा. वनगा यांचे निधन हे अतिशय धक्कादायक आणि चटका लावून जाणारे आहे. अथक संघर्ष करून त्यांनी समाजकारण आणि राजकारणामध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले होते. दुर्गम भागात राष्ट्रीय विचार पेरण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. वंचित, आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांचा स्वभाव जिद्दी असल्यामुळे हाती घेतलेले काम समाजोपयोगी असेल तर त्यासाठी सदैव संघर्ष करण्याची त्यांची तयारी होती. पदाचा हव्यास कधीच केला नाही. सोपविलेली पदे व जबाबदारी निष्ठेने पार पाडली. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन न येणारी आहे.