नंदुरबार – पालकमंत्री यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संघर्ष करण्यापेक्षा जिल्ह्यातील प्रश्नांसाठी शासनाशी लढावे, जनतेच्या कामांसाठी मी देखील त्यांच्यासोबत असेल,असा सल्ला शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी के. सी. पाडवी यांना दिला आहे.
शिवसेनेचे उत्तरमहाराष्ट्र संघटन नेते खा. संजय राऊत हे दि.11 जून रोजी नंदुरबार दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची संवाद साधत आढावा घेतला. याप्रसंगी अनेक पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री के . सी. पाडवी यांच्या भूमिकेबद्दल तक्रारी केल्या. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेले कामे केले जात नाही, पालकमंत्री यांच्याकडून दुजाभावाची वागणूक दिली जाते, अशा प्रकारच्या तक्रारी बैठकीत करण्यात आल्या होत्या, याबाबत पत्रकारांची संवाद साधतांना खा. राऊत म्हणाले की, पालकमंत्री के. सी. पाडवी हे आघाडी सरकारमधील सहकारी मंत्री आहेत. जिल्ह्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सेनेच्या पदाधिकारी त्यांच्याशी संघर्ष करण्यापेक्षा त्यांनी जर जिल्ह्यातील प्रश्नांसाठी शासनाशी लढा दिला तर मी देखील त्यांच्या सोबत राहील,असेही खा. राऊत यांनी सांगितले. राज्यातील राजकीय घडामोडींबद्दल ते म्हणाले की, आघाडी सरकार पूर्ण पाच वर्षे काढणार आहे. कारण कोरोनासारख्या कठीण काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगले काम करून दाखवले आहे. न्यायालयाने देखील त्यावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे देशात महाराष्ट्र राज्य मॉडेल राज्य ठरेल,असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.