खेळ हा आरोग्याचा पाया : सदानंद मोहोळ

0

पुणे । खेळ आणि व्यायाम या गोष्टी आरोग्याचा पाया आहेत. कोणत्याही क्षेत्रात शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. टक्केवारीच्या आग्रहापायी या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे, मुलांच्या हिताचे नाही असे मत माजी क्रिकेट खेळाडू सदानंद मोहोळ यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा कै. विलास शंकर रानडे क्रीडा पुरस्कार मनिषा बाठे लिखित ‘गाथा क्रीडातपस्वीची-वैद्य म. द. करमरकर’ या ग्रंथासाठी बाठे आणि वैशाली भट यांना मोहोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, मनीषा बाठे, वैशाली भट, शशिकांत भागवत उपस्थित होते.

प्रा. जोशी म्हणाले, उत्तम प्रकृती आणि सदृढ आरोग्यासाठी क्रीडा संस्कृती जोपासणे गरजेचे आहे, बाठे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला सभ्यता आहे. कारण, जाती धर्म, वर्णाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना खेळ शिकवणारे क्रीडाशिक्षक येथे होऊन गेले.

या पुरस्कारासाठी ग्रंथाची निवड, क्रीडापत्रकार मिलिंद ढमढेरे आणि शशिकांत भागवत यांच्या निवड समितीने केली. शशिकांत भागवत यांनी या समारंभात ग्रंथनिवडीविषयी समितीची भूमिका स्पष्ट केली. मसापच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी आभार मानले. कार्यवाह बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.