गांधींची सहिष्णुता विसरून आपला देश असहिष्णुतेच्या मार्गाने पुढे जातोय

0

डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांची खंत; मनोरंजनकार का. र. मित्र व्याख्यानमालेत ‘गांधी आणि सहिष्णुता’ या विषयावर व्याख्यान

पुणे : आज हिंसा सार्वत्रिक झाली आहे. सत्य सारे राजकीय पक्ष विसरले आहेत. आम आदमी भयभीत झाला आहे. मग काय उरले आहे आज गांधींचे?… आपण गांधींची सहिष्णुता पार विसरून गेलो आहोत. अराजकता सर्वत्र पसरत चालली आहे. आपण एका झुंडीत परावर्तित होत चाललो आहोत. आपण संवादाची संस्कृती विसरलो आहोत. बा आणि बापूंची 150 वी जयंती साजरी करताना आपला देश असहिष्णुतेच्या मार्गाने पुढे जातो, हे दुर्दैवी आहे, अशी खंत संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित मनोरंजनकार का. र. मित्र व्याख्यानमालेत ‘गांधी आणि सहिष्णुता’ या विषयावर डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते.

अभ्यंकरांच्या विचारांतच असहिष्णूता

डॉ. शंकर अभ्यंकर हे धर्माचे अभ्यासक आहेत. पण त्यांनी नसिरुद्दीन शहा आणि आमिर खान यांच्याबद्दल केलेले विधान दुर्दैवी म्हणायला हवे. अभ्यंकर यांनी ज्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा पुरस्कार घेताना नासिर आणि आमिरला देश सोडून जा, असे म्हटले, त्या अटलजींचादेखील त्यांना विसर पडला. अभ्यंकर यांना मात्र नासिर यांच्याबद्दल असहिष्णू विधान करावेसे वाटते, हे अतिशय दुर्दैवी आहे. अभ्यंकर, तुमच्या विचारांतच असहिष्णूता झळकते आहे! अशा शब्दांत डॉ. देशमुख यांनी शंकर अभ्यंकर यांच्या विधानाचा समाचार घेतला.

गाय आत्ताच का ऐरणीवर?

ते म्हणाले, गाय हा विषय आत्ताच का ऐरणीवर आला असावा?… आजच्या सरकारचे जे वंदनीय आहेत, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांची गायीविषयीची गाय हा उपयुक्त पशु आहे. गाय ही बैलाची माता आहे, आपली नव्हे, ही विधाने आज कुणी लक्षात घेणार आहे काय? पण आपण याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो.

झुंडशाहीबद्दल चिंता व्यक्त केली

देशमुख म्हणाले, नसिरुद्दीन शहा एक अस्सल भारतीय आहे आणि त्याने अभिनेता म्हणून आपल्या देशाची प्रतिमा सदैव उंचच केली आहे. अशा अभिनेत्याला आपण पाकिस्तानला निघून जा म्हणतो, देश सोडून जा म्हणतो, हे दुर्दैवी आहे. मला अभ्यंकर यांनी केलेल्या विधानाबद्दल वाईट वाटते. नसिरुद्दीन असे काय चुकीचे बोलले? झुंडशाहीबद्दल चिंता व्यक्त करण्यात काय चूक?

देशमुख म्हणाले, देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे मुस्लिम बांधव अस्वस्थ आहेत. सातत्याने त्यांच्याविषयी संशयास्पद भूमिका असणे आपल्या देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने योग्य नाही. इस्लाम हा भारताचा अविभाज्य भाग आहे, हे विसरून चालायचे नाही. सर्वसामान्य मुस्लिम शांततावादी आहेत. दहशतवादी नव्हेत.