गांधीजींची हत्या नथुराम गोडसेनेच केली

0

नवी दिल्ली : गांधी हत्येबाबत सर्वोच्च न्यायालयाने माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमरेंद्र शरण यांची न्यायमित्र (एमीकस क्युरी) म्हणून नेमणूक केली होती. त्यांनी गांधी हत्याकांडाशी निगडीत विविध दस्तऐवजांचा तपास केला आणि गांधीच्या हत्येचा पुन्हा एकदा तपास करण्याची गरज नसल्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. महात्मा गांधीची हत्या नथुराम गोडसेनेच केली असून यात अज्ञात व्यक्तीचा हात नव्हता, असे शरण यांनी अहवालात म्हटले आहे.

अज्ञात व्यक्तीचा हात नाही
अभिनव भारतचे पंकज फडणीस यांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शरण यांना यासंबंधीचे निर्देश दिले होते. महात्मा गांधी यांची हत्या एका अज्ञात व्यक्तीने केली होती. त्या अज्ञात व्यक्तीनेच चौथी गोळी झाडली होती. या चौथ्या गोळीचे रहस्य कधी सुटलेच नाही, असा दावा करत पुन्हा नव्याने याचा तपास व्हावा, अशी मागणी फडणीस यांनी त्यांच्या याचिकेत केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शरण यांनी आपला अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवला आहे.