गाळ्यांची थकीत रक्कम भरण्यासाठी आज शेवटचा दिवस

0


प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष, तर बिलांवर होणार दीडपट दंड आकारणी

जळगाव-मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील गाळेधारकांना कलम 81 ब आणि क नुसार नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच 30 जूनपर्यंत बिले भरण्यासाठी दि.11 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून उद्या दि.11 रोजीचा शेवटचा दिवस आहे. मुदतीत न भरल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्याअनुषंगाने कारवाईसाठी उपायुक्त उत्कर्ष गुठे यांना प्राधिकृत केले आहे.त्यामुळे आता प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.

मनपा मालकीच्या 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली आहे. तेव्हापासून गाळेधारक थकबाकीदार आहेत.तसेच मनपा अधिनियम क लम 81 ब च्या आदेशानंतर सुध्दा ताब्यात ठेवून अनधिकृतरित्या वापर सुरु आहे. गाळेधारक अनधिकृत कब्जेदार असल्यामुळे मनपा अधिनियम शासनाच्या आदेशानुसार मुदतीनंतर अनधिकृतरित्या ताब्याच्या कालावधीतील नुकसान भरपाईची रक्कम भरण्यासाठी कलम 81 क नुसार नोटीस बजावली आहे.तसेच
मनपा प्रशासनाने कलम 81 क नुसार बजावलेल्या नोटीस नुसार निश्‍चित करण्यात आलेली नुकसान भरपाईची रक्कम दि.11 आक्टोबरपर्यंत भरणा करण्यासाठी मुदत दिलेली आहे.दिलेल्या मुदतीत भरणा न केल्यास कठोर कारवाई करण्याचा प्रशासनाने इशारा देखील दिला आहे. थकीत रक्कम भरणा करण्याचा दि.11 ऑक्टोबर शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुदत दिल्यानंतरही थकीत रकमेचा भरणा न करणार्‍या गाळेधारकांवर काय कारवाई केली जाते याकडे आता लक्ष लागले आहे.

रेडीरेकनरनुसार दंड आकारणी
गाळेधरकांना रेडीरेकनरनुसार आकारणी करुन त्या रकमेवर विलंब व्याज ,मालमत्ता करासह दि.30 जून 2019 पर्यंत बिले दिली आहेत.गाळेधारकांनी थकीत रकमेचा भरणा न केल्यास 30 जूनपासून प्रचलित रेडीरेकनर दराच्या दीडपट दंडाची आकारणी देखील केली जाणार आहे.