पिंपरी-चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी गाळ काढण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला आहे. या धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासह एमआयडीसी, तळेगांव, देहूरोड आणि मावळातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा होत होता. गेल्या दोन वर्षापासून सातत्याने धरणातून 75 हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. गाळ काढल्यामुळे धरणात 45 दिवस पुरेल, इतका अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जल संवर्धनाच्या दृष्टीन सुरू केलेल्या या कामात खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्य ठेवले असून सलग तिस-या वर्षी गाळ काढण्याच्या कामाची सुरुवात गुरुवारी (10 मे) पवना धरण भागात केली.
खासदार निधीतून केले काम
पवना धरणातील पाण्याचा वापर पिंपरी-चिंचवड शहराला 100 टक्के पाणीपुरवठा केला जातो. धरणातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका 490 एम. एल.डी व एम.आय.डी.सी 100 एम.एल.डी पाणी उचलते. तसेच तळेगांव, देहूरोड, शहर व शहराबाहेरील उद्योग आणि मावळमधील शेतक-यांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. उद्भवणारी पाणी टंचाई टाळण्यासाठी आणि पाणीसाठा वाढवण्यासाठी या पवना धरणामध्ये गेल्या 50 वर्षांपासून साठलेला गाळ काढणे आवश्यक होते. खासदार बारणे यांनी या संदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना पत्रव्यवहार केला. परंतु, पाटबंधारे विभाग आणि महापालिका यांच्यात हद्द व कार्यक्षेत्राच्या वादात हे काम सुरू होऊ शकले नाही. अखेर खासदार बारणे यांनी पुढाकार घेत खासदार स्थानिक विकास निधीतून हे काम सुरू करण्याचा निश्चय केला.
यांची होती उपस्थिती
खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते तिस-या वर्षी गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी पाट बंधारे विभागाचे उपअभियंता नानासाहेब मटकरी, शाखा अधिकारी मनोहर खाडे, मंडल अधिकारी बलकवडे, तालुका प्रमुख राजु खांडभोर, भारत ठाकुर, महिला संघटिका आशाताई देशमुख, युवा सेना अधिकारी अनिकेत घुले, विभाग प्रमुख अमित कुंभार, चंद्रकांत भोते, देहुरोड शहर प्रमुख महेश धुमाळ, वाहतुक सेना महेश केदारी, सरपंच उमेश दहिभाते, उपसरपंच संदिप झांबरे व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.