गिलगिट, बाल्टिस्तान भारताचा अविभाज्य भाग

0

लंडन । गिलगिट आणि बाल्टिस्तानला पाचवा प्रांत म्हणून घोषित करण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाचा ब्रिटनने निषेध केला आहे. ब्रिटीश संसदेत या संदर्भात प्रस्तावच मंजूर करण्यात आला त्यात गिलगिट आणि बाल्टिस्तान हा भाग भारताच्या जम्मू काश्मीरचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे. सध्या पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तुनख्वा आणि पंजाब असे चार प्रांत आहेत. आता पाकिस्तानने गिलगिट आणि बाल्टिस्तानला पाचवा प्रांत घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान आणि चीनमधील आर्थिक हितसंबंधांच्या दबावातून पाकने हा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे. या निर्णयासाठी पाकला घटनादुरुस्ती करावी लागणार आहे. या प्रस्तावामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये कटूता निर्माण होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला दिलासा
दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरही या प्रस्तावाचा निषेध होत आहे. ब्रिटीश संसदेतील खासदार बॉब ब्लॅकमन यांनी प्रस्ताव मांडला. यात पाकिस्तानचा निषेध करण्यात आला होता. गिलगिट आणि बाल्टिस्तान हे भारतातील जम्मू काश्मीरचाच हिस्सा असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. 1947 पासून पाकिस्तानने या भागावर अवैध कब्जा केला आहे. या भागातील लोकांना पाकने सुविधा दिल्या नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्यही दिले जात नाही असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या भागात काही बदल करणे हे क्षेत्रात अशांतता निर्माण करु शकेल अशी भीतीही प्रस्तावात वर्तवण्यात आली आहे. भारताने गिलगिट आणि बाल्टिस्तान हा भागावर नेहमीच दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटन संसदेतील हा ठराव भारताला दिलासा देणारा आहे.

नद्यांवरील प्रकल्पामुळे पाकचा थयथयाट
भारतातुन पाकिस्तानकडे वाहणार्‍या नद्यांवर बर्‍याच ठिकाणी धरणे व वीज निर्मिती प्रकल्पांचे काम भारताने वेगात सुरु केलेले आहे. या प्रकल्पांमुळे अशा नद्यांचे पाणी बर्‍याच प्रमाणात भारतातच अडविले जाणार असल्याने पाकिस्तानचा थयथयाट सुरु आहे. अशी नाकेबंदी होत असल्याने पाकिस्तानी चिनशी मैत्री दृढ करण्याचा विचार केल्यामुळे पाकिस्तानला चिनच्या दबावात राहण्याची अगतिकता मान्य करावी लागते आहे. मात्र जागतिक पातळीवर भारताच्या भुमिकेला मान्यता मिळत असल्याने पाक-चिन मैत्रीवर प्रश्‍नचिन्ह लावले जाऊ शकते.