गुजरातमध्ये ब्राह्मण आणि राजपूत समाजाला हवे आरक्षण

0

अहमदाबाद : महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुजरातमध्येही पाटीदारांनंतर तेथील ब्राह्मण आणि राजपूत समाजानंही आरक्षणाची मागणी केली आहे. ब्राह्मण समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी ओबीसी आयोगाकडे करण्यात आली आहे. त्यामुळं आता गुजरातमध्येही पुन्हा आरक्षणासाठी आंदोलनं होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

समस्त गुजरात ब्राह्मण समाजानं ओबीसी आयोगाला आरक्षणाच्या मागणीचं पत्र पाठवलं आहे. ओबीसी कोट्यातून आम्हाला आरक्षण देण्यात यावं, त्यासाठी सर्व्हे केला जावा, असं त्या पत्रात म्हंटले आहे. गुजरातमध्ये ६० लाख ब्राह्मण आहेत. हा आकडा एकूण लोकसंख्येपैकी ९.५ टक्के असून ४२ लाख ब्राह्मण हे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. त्यानुसार, गुजरात सरकारनं सर्व्हे करून ब्राह्मणांना आरक्षण द्यावं, अशी मागणी समाजाचे प्रमुख यज्ञेश दवे यांनी केली आहे.

दुसरीकडे, राजपूत गारसिया समाज संघटनेच्या नेत्यांनीही ओबीसी आयोगाच्या सदस्यांची भेट घेवून राजपूत समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी संघटनेचे नेते राजन चावडा यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. राजपुत समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये समान संधी दिली जात नाही. त्यांना मुख्यतः शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. इतर समाजांशी तुलना केल्यास आमच्या समाजातील कमावणाऱ्या महिलांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळं ओबीसी कोट्यातून आम्हाला आरक्षण देण्यात यावं. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी आमच्या समाजाची लोकसंख्या ८ टक्के आहे. त्यानुसार आम्हाला आरक्षण मिळावं, असं त्यांनी पत्रात म्हंटले आहे.