पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या मिरवणुकीने वेधले लक्ष
जळगाव– शिख धर्मियांचे पहिले गुरु गुरुनानक साहेब यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयेजन करण्यात आले आहे. सकाळी शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे.तसेच गुरुद्वारामध्ये अखंड पाठ होणार आहे.गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वारा ट्रस्ट तर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्या दि.12 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी मिरवणुकीनंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
जळगावात 50 वर्षापूर्वी बांधला गुरुद्वारा
पूर्वी सुभाष चौकाजवळ असलेल्या उर्दू शाळेजवळ प्रार्थना व्हायची. 50 वर्षा पूर्वी,काझी यांनी गुरुद्वारासाठी सिख बांधवांना जागा विकली.त्याकाळी ही जागा 3000 रुपयाला विकली गेली होती.त्यांतर समाज बांधवांनी या जागेत गुरुद्वारा उभारण्याचा निर्णय घेतला. गुरुद्वारासाठी प्रेम सिंग यांनी स्टीलची देणगी दिली.तसेच समाज बांधवांनी स्वखर्चाने ही वास्तू उभी केली आहे . पंजाबच्या कारागीरांकडून गुरुद्वाराचे बांधकाम करण्यात आले आहे. गुरुद्वारा ट्रस्ट तर्फे प्रत्येक रविवारी लंगर (महाप्रसाद) भरवला जातो.या लंगरचा सर्वधर्मीय लाभ घेतात व गुरुसाहेबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात.
गुरुनानक यांनी दिला एकतेचा संदेश
गुरूनानक हे शीख धर्माचे संस्थापक गुरू आहेत. नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहौर जवळ तळवंडी येथे 15 एप्रिल 1469 रोजी झाला. या गावाला आता ननकाना साहिब असे म्हटले जाते. देशभर गुरू नानक यांचा जन्म दिन प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.गुरू नानक लहानपणापासूनच धार्मिक होते. लहानपणी मौंजीबंधनावेळीच त्यांनी जानवे घालायला नकार दिला होता. ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली. जगभरातील धार्मिक स्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या.सर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली गुरू नानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. त्यांनी त्या काळात केवळ भारतभ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियात मक्का- मदिनेचीही यात्रा केली होती. अनेक अरब देश त्यांनी पालथे घातले होते.गुरू नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती. एकदा बेई नदीतून स्नान केल्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी ’कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्व जण मानव आहोत’, असा नारा दिला होता. हे जग बनविणारा एकच इश्वर आहे, असे त्यांचे म्हणणे होते. धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही, अशी त्यांची धारणा होती.त्यासाठी अनेक केंद्राची साखळी निर्माण केली. त्यांनी एकता, श्रद्धा व प्रेमाचे तत्वज्ञान मांडले. ते क्रांतिकारी विचारांचे होते. त्यांनी नवीन विचारधारेचा प्रचार केला.