गेल्या वर्षी 3,052 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

0

उस्मानाबाद- मराठवाड्याचे नेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे आमदार चिरंजीव यांचा शाही लग्नसोहळा गाजत असतानाच एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षभरात म्हणजे 2016 या वर्षात राज्यातील तब्बल 3 हजार 52 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2016 या कालावधीत महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची ही माहिती आहे.

राज्य मदत आणि पुनर्वसन खात्याकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या 3 हजार 52 शेतकर्‍यांपैकी 1 हजार 621 शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना सरकारने प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. यापैकी 1 हजार 167 प्रस्ताव अपात्र ठरवण्यात आले असून 264 प्रस्तावांची चौकशी सुरू असल्याचे समजते आहे.

विभागनिहाय आकडेवारी
अमरावती – 1085
औरंगाबाद – 1053
नाशिक – 479
नागपूर – 360
पुणे – 75
कोकण – 0
मराठवाड्यात 2015 पाठोपाठ 2016 मध्येही शेतकरी आत्महत्यांनी एक हजारचा आकडा पार केला आहे. 1 जानेवारी ते 12 डिसेंबर 2016 या काळात तब्बल 1003 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची माहिती औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आली होती.

2016 मध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या होत्या. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा वाढला नसला तरी देखील ही अत्यंत चिंतेची बाब मानली जात आहे.