जयपूर: सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने कॉंग्रेस सरकार अडचणीत आले आहे. सचिन पायलट यांच्यावर कॉंग्रेसने कारवाई केली असली तरी कॉंग्रेसवरील धोका अद्याप टळलेला नाही. दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल यांच्याकडे विधानसभेचे सत्र बोलविण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी राज्यापलांनी आज शुक्रवारी फेटाळून लावत गेहलोत यांना धक्का दिला आहे. सत्र बोलवून बहुमत सिद्ध करण्याची तयारी गेहलोत यांनी दाखविली होती. मात्र राज्यपालांनी सत्र बोलविण्याची मागणी फेटाळली आहे.
पत्रकार परिषदेत अशोक गेहलोत यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी अतिशय तीव्र शब्दात भाजपवर टीका केली. राजस्थानच्या राजकारणात “नंगानाच” सुरु आहे अशी टीका गेहलोत यांनी केली आहे. राज्यपाल संविधानिक पदावर आहे, त्यांनी निपक्षपणे काम करणे अपेक्षित आहे. मात्र राज्यपाल तसे वागत नसल्याचे आरोप गेहलोत यांनी केले आहे.
कॉंग्रेसने आता राज्यपालांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची तयारी सुरु केली आहे. कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि इतर नेत्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यासाठीची तयारी सुरु केली आहे.
दरम्यान आता कॉंग्रेस नेत्यांना आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना भेटण्यासाठी राज्यपालांना वेळ दिली असून दुपारी २ वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत.