गोरक्षकांचे काम हे खबर्‍यांसारखे असल्यामुळे यापुढेही सुरूच राहील : मिलिंद एकबोटे

0

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे अर्थ गोरक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न

पुणे । गोरक्षकांचे काम हे खबर्‍यांसारखे असते. ते माहिती गोळा करून पोलिसांकडे देत असतील, तर त्याला कोणत्याही न्यायालयाने प्रतिबंध केलेला नाही. कायदा हातात न घेता गुन्हे थांबविण्याचे काम सध्या गोरक्षकांकडून सुरू आहे. त्यामुळे सुयोग्य प्रक्रियेद्वारे गोरक्षकांचे काम यापुढेही चालूच राहील. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांबाबत अनेकांमध्ये समज-गैरसमज असून त्याचा खरा अर्थ गोरक्षक व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती अखिल भारत कृषि गोसेवा संघ, पश्‍चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी भारतीय पशु कल्याण मंडळाचे पशु कल्याण अधिकारी मनोज ओसवाल उपस्थित होते. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांत गोरक्षक हे जोपर्यंत कायदा हाती घेत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या कृतीला स्थगिती द्यायला नकार देण्यात आला आहे.

बकरी ईदच्या काळात २५० हून अधिक गायींचे संरक्षण
एकबोटे म्हणाले, गेल्या काही काळात महाराष्ट्रात गोरक्षकांकडून एकही हिंसक कृती झालेली नाही. सुमारे २५० हून अधिक गायी आणि त्यांचा वंश हा नियमित प्रक्रियेनुसारच, बकरी ईदच्या काळात वाचवण्यात आला. महाराष्ट्रातील गोरक्षक हे गेल्या काही वर्षांमध्ये कोणत्याही हिंसक कृतीशिवाय, नियमीतपणे गुराढोरांच्या तस्करांविरोधात एफआयआर दाखल करत आहेत. यापुढेही गोरक्षक हे सुयोग्य प्रक्रियेद्वारे त्यांचे कार्य पुढे चालू ठेवतील आणि देशाला मदत करून, कृषिपशूंची राष्ट्रीय संपत्ती जतन करतील. गोरक्षणाचे महत्त्व सामान्य नागरिकांना पटवून दिल्यास या उपक्रमास हिंसक वळण लागणार नाही.

गोरक्षकांना कायदेशीर संरक्षण
मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या इतर दोन याचिकांमध्ये एक याचिका ही कुबार्नीच्या काळात पशुंना घेऊन जाणार्‍या वाहनांना अप्रतिबंधित करण्यासाठी निर्देश मागितले होते. शादाब पटेल यांनी दाखल केलेली ही याचिका फेटाळून लावतानाच, हे स्पष्ट करण्यात आले की, यासंदर्भात राज्य सरकार आणि पोलिसांनी उचललेली पावले ही पुरेशी आणि योग्य आहेत.

महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या कलम १३ प्रमाणे सद्हेतूने प्राणीरक्षणाचे काम करणार्‍यांवर कारवाई होऊ शकत नाही, असे कायदेशीर संरक्षण गोरक्षकांना देण्यात आले आहे. त्यामुळे गोरक्षकांचे काम यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.

अजामिनपात्र गुन्हा
मनोज ओसवाल म्हणाले, क्रिमिनल प्रोसिजर कोडनुसार, कोणताही नागरिक हा कोणताही गुन्हा थांबवण्यासाठी तत्काळ कृती करू शकतो आणि गुन्हेगाराला पकडूही शकतो, जर तो गुन्हा त्याच्या समोर घडत असेल, जो गुन्हा गंभीर स्वरुपाचा आणि अजामिनपात्र असेल. बकरी ईदच्या काळात, प्राण्यांची सर्रासपणे तस्करी होते आणि यात हस्तक्षेप करणार्‍यांनी स्वतंत्रपणे याचिका दाखल केल्या पाहिजेत.