मुंबई : रविवारी मुंबईत भाजपतर्फे आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित असलेले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गोरखपूरमधील घटनेवरुन योगी सरकारवर नाराजी व्यक्त केली. नवभारत घडवत असताना अशी लाजिरवाणी घटना देशात घडायला नको, असे ते म्हणाले. गोरखपूरमध्ये बाबा राघव दास रूग्णालयात 72 बालकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयानेही योगी आदित्यनाथ सरकारला जाब विचारला आहे. आता जेटलींनी घरचा आहेर दिल्याने योगी आदित्यनाथांची चांगलीच कोंडी होणार आहे. कारण, अगोदरच बालमृत्यूच्या घटनेवरून आक्रमक झालेल्या विरोधकांना आयते कोलीत मिळणार आहे.
काश्मिरातील स्थितीत सुधारणा!
जम्मू-काश्मीरमधील हिंसाचारावर बोलताना जेटली म्हणाले, दगडफेक करणार्यांची आर्थिक रसदच बंद केली पाहिजे. दगडफेक करणार्यांना जी लोक आर्थिक मदत करत होती त्यांच्यावर आम्ही कारवाई केली. त्याचा परिणाम जम्मू-काश्मीरमध्ये दिसून येत आहे. दगडफेकीच्या घटनाही कमी झाल्या असून, बर्याचदा पळ काढण्यासाठी दहशतवादी स्वतःच दगडफेक करतात. नोटाबंदीनंतर एनआयएने फुटिरतावाद्यांना परदेशातून मिळणारी आर्थिक रसदच बंद केली. आता फुटिरतावाद्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहेे. मी आणि सुषमा स्वराज आम्ही दोघे विरोधी पक्षनेतेपदावर असताना आमचे काम सोपे होते. तत्कालीन सरकारमध्ये भ्रष्टाचार असल्याने रोज नवीन प्रकरण उघड व्हायचे असे सांगत त्यांनी काँग्रेसला चिमटा काढला.