मोदी सरकारकडून सर्वात मोठे पॅकेज
नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी तसेच देशातील गरीब, कामगारांसह गरजू लोकांना मदत देण्यासाठी मोदी सरकारने तब्बल १.७ लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज दिले आहे. हा निधी तब्बल १० कोटी लोकांच्या थेट बँक खात्यात टाकण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे. याकाळात कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसेही असावेत, हा उद्देश असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत हे पॅकेज देण्यात आले आहे.
देशात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेत आहोत असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. आशा वर्कर, नर्सेस आणि आरोग्य विभागात काम करणार्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचंही सीतारामन यांनी जाहीर केले. देशभरातील २० लाख आरोग्य कर्मचार्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. गरीबांना पाच किलो गहू किंवा तांदूळ १ किलो डाळ मोफत मिळणार. पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना असणार आहे. अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली. एकही गरीब माणूस उपाशी झोपणार नाही याची काळजी आम्ही सराकर म्हणून घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. देशातील ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या घोषणा
१) कोरोनाव्हायरसचा सामना करणार्या डॉक्टर, पॅरामेडिकल आणि आरोग्य सेवेसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण.
२) एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकर्यांना २००० रुपये देण्यात येणार.
३) जनधन योजनेंतर्गत २० कोटी महिला खातेधारकांना महिना ५०० रुपये देण्यात येणार.
४) उज्ज्वला योजनेंतर्गत ८.३ कोटी बीपीएल कुटुंबीयांना पुढील तीन महिने तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत.
५) वृद्ध, दिव्यांग, पेन्शनधारकांना पुढील तीन महिने १००० रुपये देण्यात येणार आहेत. ३ कोटी लोकांना फायदा.
६) बचत गटाच्या महिलांना कोणतीही संपत्ती तारण न ठेवता मिळणारे कर्ज दुपटीने वाढविले. आता २० लाखांचे कर्ज मिळणार. ७ कोटी महिलांना फायदा.
७) पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून पुढील ३ महिने ८० कोटी लोकांना दर माणसी ५ किलो तांदूळ किंवा गहू देण्याचे ठरविण्यात आले आहे. यामध्ये आणखी ५ किलोंची वाढ करण्यात आली आहे. तसेच १ किलो डाळही देण्यात येणार आहे.
८) मनरेगातून ५ कोटी कुटुंबांना महिना २ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील मनरेगाच्या नागरिकांना मिळणारी बिदागी १८२ रुपयांवरून २०० रुपये करण्यात आली आहे.
९) सरकार पुढील तीन महिने खासगी नोकरदारांच्या पीएफ खात्यामध्ये कंपनी आणि कर्मचार्याचा भाग असे दोन्ही २४ टक्के टाकणार आहे. यासाठी ही कंपनी १०० पेक्षा कमी कर्मचारी आणि ९० टक्के कर्मचार्यांचा पगार १५००० पेक्षा कमी असायला हवा.
१०) कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातून ७५ टक्के नॉन रिफंडेबल अॅडव्हान्समध्ये पैसे काढू शकणार आहेत. किंवा तीन महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम काढू शकणार आहे.