नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने दिल्ली क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. युवा खेळाडूंकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत गंभीरने व्यक्त केले. त्याच्या या निर्णयानंतर दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनने रणजी करंडक स्पर्धेसाठीच्या दिल्ली संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी नितीश राणाकडे सोपवली. 2018-19च्या रणजी हंगामात ध्रुव शोरेय उपकर्णधार असणार आहे.
Time to pass the captaincy baton to youngsters, hence have requested the DDCA selectors not to consider me for that role. I will be in the background helping the new leader to win games @RajatSharmaLive
— Gautam Gambhir (@GautamGambhir) November 5, 2018
मधल्या फळीतील फलंदाज 24 वर्षीय राणाने 24 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 46.29च्या सरासरीने धावा केल्या आहेत, तर 26 वर्षीय शोरेयने 21 सामन्यांत दिल्लीचे प्रतिनिधित्व केले आहे. ”राज्य संघाचे निवड समिती प्रमुख अमित भंडारी यांच्याकडे गंभीरने कर्णधारपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. युवा खेळाडूकडे ही जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी विनंती त्याने केली आहे,” अशी माहिती दिल्ली क्रिकेट असोसिएशनने दिली आहे. दिल्लीचा पहिला सामना 12 नोव्हेंबरला फिरोज शाह कोटला मैदानावर होणार आहे. 37 वर्षीय गंभीरने कर्णधारपद सोडले असले तरी तो पुढे खेळणार की नाही याबाबत संभ्रम आहे.