ग्राहकांमध्ये हक्कांविषयी जागरूकता आवश्यक

0

दिलीप देशपांडे: सध्याचा काळ हा स्पर्धेचा आहे, तसा जाहिरातीचाही आहे जो तो आपला उत्पादित माल बाजार पेठेत कसा जास्त विक्री होईल या प्रयत्नात असतो. ग्राहक राजा आहे किंवा ग्राहक देव आहे, अशी विशेषणे ग्राहकाला लावली जातात आणि दुसरीकडे अनेक प्रलोभन दाखवून ग्राहकांना आपल्या वस्तूंच्या खपासाठी आकर्षित केले जाते आणि जाळ्यात ओढले जाते. बर्‍याचदा अशा प्रलोभनांना ग्राहक बळी पडतो. त्यातच त्याची फसवणूक केली जाते. पँण्टवर शर्ट मिळणार अगदी फुकट, बाय वन गेट वन, तर कधी विशिष्ट रकमेचा माल खरेदी केला तर कुपन मिळेल, कुपनची सोडत निघणार त्यात हमखास बक्षीस मिळवा, सोने खरेदीवर चांदीचे नाणे किंवा गिफ्ट, फ्लँट खरेदीवर टू व्हीलर मिळवा अश्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर केल्या जातात आणि त्यालाच अनेकजण भुलतात. प्रसंगी फसवणूक होते. ग्राहक दिन साजरा करण्यामागचा उद्देश बघितला तर ग्राहकांची फसवणूक होवू नये, सेवा पुरवताना हलगर्जीपणा होवू नये म्हणून ग्राहकाला ग्राहक कायद्याची माहिती असायला हवी.

1960 मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीत ग्राहक चळवळीचा मुद्दा उपस्थित झाला होता. अध्यक्ष केनेडी यांनी ग्राहकांच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केल. जागतिक पातळीवर पाठपुरावा केला गेला, त्याला युनेस्कोकडून मान्यता मिळाली आणि तद्नंतर दरवर्षी 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. भारतात 1986 मध्ये राष्ट्रपतींनी ग्राहक हक्क संरक्षण कायद्याला मंजुरी दिली. तेव्हापासून ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकास सहा प्रकारचे हक्क प्राप्त झाले आहेत. प्रत्येक ग्राहकास आपले हक्क माहित असतील तर त्याची फसवणूक होणार नाही.

काय आहे हे हक्क?
1) सुरक्षेचा हक्क ः एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा त्या वस्तूच्या सुरक्षिततेची हमी उत्पादकानी घेणे आवश्यक असते. जसे फ्रीज, टी.व्ही., वाँशिंग मशिन, मोटर बाईक, कार वगैरे कुठल्याही वस्तू.
2) माहितीचा हक्क ः आपण खरेदी करत असलेल्या वस्तूंच्या गुणवत्तेबद्दल माहिती विक्रेत्याने ग्रहकांना देणे बंधनकारक आहे.त्यात फसवणूक करु नये.
3) निवड करण्याचा हक्क ः विक्रेता एकाच प्रकारचे उत्पादन वा ब्रँण्डचा आग्रह करु शकत नाही. निवडीचा अधिकार ग्राहकांना आहे.
4) म्हणणे मांडण्याचा हक्क ः ग्राहकाला आपली फसवणूक झाली असल्याचे वाटत असेल तर आपले म्हणणे योग्य न्यायासाठी मांडण्याचा हक्क आहे.
5) तक्रार करण्याचा, तसेच तिचे निवारण्यासाठीचा हक्क ः फसवणूक झाली असेल तर, न्यायासाठी तक्रार निवारण करुन घेण्यासाठी ग्राहक मंच, राज्य ग्राहक परिषदेत जाण्याचा हक्क आहे.
6) ग्राहकांचा हक्कांविषयी शिक्षणाचा अधिकार ः ग्राहकाला त्याचे हक्क, कर्तव्ये माहिती नसल्यामुळे बाजारपेठेत फसवणूक होते. ते समजण्यासाठी स्वयंसेवी संस्था, शासनाकडून प्रबोधन केले जाते.
ग्राहकांची फसवणूक झाली असेल तर त्याला न्याय हा मिळतोच, पण आपल्या हक्का सोबतच काही कर्तव्ये आहेत याची जाणीव सुद्धा ग्राहकांनी ठेवायला हवी.

काय आहे ती कर्तव्ये आणि जबाबदार्‍या?
बाजारपेठेत एका उत्पादनासाठी अनेक उत्पादक असतात. त्यात स्पर्धा ही असणारच. फसव्या जाहिरातीला ग्राहकाने बळी पडू नये. बर्‍याचदा धमाका सेल असतात, आँनलाईन खरेदीवर डिस्काउंट सेल असतात. अशा वेळी न खपलेला किंवा काही दोष असलेला माल असू शकतो. सावधपणे खरेदी करावी. खरेदी करतांना मालाचे बिल आवश्यक आहे. बिलाचा आग्रह धरावा. न दिल्यास विक्रेत्याची तक्रार करावी. कारण, माल दोषयुक्त असेल तर बिलाशिवाय आपण काहीच करु शकत नाही.

एम.आर.पी. पेक्षा (मॅक्झिमम रिटेल प्राईज) जास्त किंमत देऊ नका. खरेदी करतांना ती बघा. वस्तूंची मुदत (एक्सपायरी डेट) तपासा. ती संपली असेल तर वस्तू नाकारावी. अशा वस्तूंचा वापर हानिकारक ठरु शकतो. पेट्रोल भरतांना मीटरवर शून्या कडे लक्ष द्या. शुध्दतेविषयी शंका असल्यास पुरवठा निरीक्षक, तहसीलदार यांचेकडे तक्रार करा.

सोने खरेदी वेळी हाँलमार्क कडे लक्ष द्या. ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना योग्य काळजी घ्या. पदार्थ खराब आढळून आल्यास ताबडतोब तक्रार करावी. ग्राहकांना योग्य तो न्याय मिळावा म्हणून जिल्हा पातळीवर जिल्हा ग्राहक मंच कार्यरत आहेत.विनाशुल्क आपण तक्रार दाखल करु शकतो. राज्य पातळीवर राज्य ग्राहक परिषद आहे, तर केंद्रात राष्ट्रीय परिषद आहे.


गावपातळीवर ग्राहकांसाठी ग्राहक सेवा संस्था, ग्राहक पंचायत, प्रवासी संघ कार्यान्वित आहेत. ग्राहकांवर अन्याय होऊ नये म्हणून त्या कार्य करतात. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समिती आहे. या समितीत विविध विभागातील सदस्यांची निवड केली जाते. शासकीय सदस्य व अशासकीय सदस्य असतात.

काही वर्षांपासून शासनात ग्राहक संरक्षण विभागाची निर्मिती केली आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे मंत्र्याची केली नेमणूक आहे.शहरी, ग्रामीण भागात ग्राहकांचे हक्क रक्षण होणे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी व्यवस्था असली तरी ग्राहकास खूप काळ न्यायासाठी ताटकळत बसावे लागते. अनेक ठिकाणी जिल्हा ग्राहक मंचावर अध्यक्ष नसतात. त्यांच्या नेमणुका लवकर होत नाही, तर कधी मंचाचे सदस्य नसतात. 90 दिवसांत न्याय मिळण्याचा हेतू साध्य होत नाही. शासनाचे दुर्लक्षच म्हणावे लागेल.

ग्राहकांच्या वाढत्या फसवणुकीचे प्रकाराला आळा बसावा म्हणून केंद्र सरकारने जागो ग्राहक जागो अभियान सुरु केले आहे. बँका, सार्वजनिक वितरण, वीज, बांधकाम, अन्न-औषध, पर्यटन, पोस्ट अशा विविध प्रकारच्या खात्यांच्या तक्रारी ह्या अभियानाच्या हेल्पलाइनवर ग्राहक करु शकतो. जागतिक ग्राहक दिन, राष्ट्रीय ग्राहक दिनाचे शासकीय पातळीवरून आयोजन केले जाते. त्यात औपचारिकता असते. अपवाद सोडले तर बहुतांशी उदासीनता असते. कार्यक्रम संबंधित प्रसार, प्रचार व्हावा तो होत नाही. ठराविकच लोकांना पत्रिका वाटून कार्यक्रम होतात. ज्यांना पत्रिका जातात ते कोणीही कार्यक्रमात नसतात. ही सत्यता आहे. कार्यक्रमास ग्राहकांची उपस्थितीचा अभाव असतो. बर्‍याचदा तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी, वेंडर, स्वस्तधान्य दुकानदार हेच उपस्थित असतात. 10 ते 15 लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम उरकून घेतला जातो. ज्या आत्मियतेने आयोजन अपेक्षित आहे ते केले जात नाही.

वास्तविक अशा कार्यक्रमात वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी, गॅस एजन्सी, वजनमापे विभागाचे अधिकारी उपस्थित हवेत. ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायदा समजवून सांगायला हवा ते होत नाही. कायद्याने ग्राहकांना हक्क, अधिकार दिले आहेत. ग्राहक म्हणून त्याचा कसा वापर करायचा ते आपणच ठरवायचे आहे. कारण, ग्राहक शक्ति + न्याय शक्ति + दंड शक्ती = शोषण मुक्ती हेच समीकरण आहे. न्याय मिळवण्यासाठी न घाबरता तक्रार करायलाच हवी. ग्राहकाने त्यास दिलेल्या हक्काचा योग्य वापर करून आपली कर्तव्ये लक्षात ठेवून बाजारपेठेत जागृत राहून खरेदी करणेही अपेक्षित आहे. जेणे करुन तो फसवणुकीतून वाचू शकेल.